रत्नागिरी : वाशी खारेपाटातील ग्रामस्थांची जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र शासनाला श्रद्धांजली | पुढारी

रत्नागिरी : वाशी खारेपाटातील ग्रामस्थांची जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र शासनाला श्रद्धांजली

पेण; पुढारी वृत्तसेवा : पेण तालुक्यातील खारेपाट भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पिण्याचे आणि सिंचनाचे हक्काचे पाणी मिळावे यासाठी येथील नऊ नागरिकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र याबाबत अधिवेशनात आमदार सुनील शिंदे आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी आवाज उठवला. त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस नंदा म्हात्रे आणि स्थानिक विद्यमान आमदार रविंद्र पाटील यांनी शासनाकडे यापूर्वी पत्रव्यवहार करून देखील या प्रश्नाकडे लक्ष दिले जात नसल्याने आज सातव्या दिवशी देखील उपोषणाची दखल न घेणाऱ्या जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र शासनाला पेण खारेपाट विभागाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. ही श्रध्दांजली वाहण्यासाठी या भागातील महीला वर्ग, जेष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी यांसह शेकडो ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते.

पेण तालुक्यातील हेटवणे धरण मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे काम गेली सोळा वर्षांपासून प्रलंबित आहे. याच पाण्यावर येथील 52 गावांमधील 4268 हेक्टर सिंचन क्षेत्र आणि हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. मात्र सोळा वर्षे होऊन गेली तरी हे काम का पुर्ण होत नाही. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे आणि तशा प्रकारचे लेखी पत्र राज्य शासनाचे द्यावे तसेच या कालव्याच्या पुढील कामाचे नियोजन करण्याकरता प्रकल्पास चतुर्थ सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. या कोणत्याही गोष्टीकडे आणि आमरण उपोषणाकडे अधिवेशन सुरू होऊन सात दिवस झाले तरी गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने आज बुधवारी सायंकाळी उपोषणाची दखल न घेणाऱ्या जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र शासनाला पेण खारेपाट विभागाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

वाशी येथे शेकडो महिला पुरुष मुलं एकत्र

पेण तालुक्यातील वाशी येथे गेले सात दिवसा पासून हेटवणे धरणाचे पाणी खारेपाटातील गावांना अजून मिळाले नाही याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी एकत्र येत आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र जलसंपदा विभागाचा एकही प्रतिनिधी किंवा शासनाचा एकही व्यक्ती या उपोषणाकडे आला नसल्याच्या निषेधार्थ आम्ही आज बुधवारी रात्री चक्क जलसंपदा विभागाला आणि शासनाला श्रद्धांजली वाहत आहोत.
आणि यासाठी शेकडो महिला पुरुष व मुलांनी एकत्र येत शासनाचा निषेध करीत हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन शासन मेलं असेल किंवा झोपले असेल याच्या निषेधार्थ आम्ही श्रद्धांजली वाहत आहोत.’
नंदा म्हात्रे, आमरण उपोषणकर्त्या

Back to top button