सासवड: पुरंदर तालुक्यातील ग््राामीण भागात भोंदूगिरी करणाऱ्या बाबांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यांनी नागरिकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट सुरू केल्याचे चित्र समोर येत आहे. भोळ्या श्रद्धाळूंना विविध भूलथापा देत हजारो रुपये उकळले जातात, तर काही भोंदूबाबांनी या माध्यमातून लाखोंची मालमत्ता उभी केल्याची चर्चा आहे.
या भोंदूकडून ‘व्यवसाय उभा करून देतो, कोर्ट केस जिंकून देतो, घरातील आजार बरा करतो, कर्ज फिटवतो, शेतीत भरघोस उत्पन्न मिळवून देतो, लग्न जमवतो,’ असे अवास्तव आश्वासन देत नागरिकांना जाळ्यात ओढून दिशाभूल केली जाते. समस्याग््रास्त लोकांना मानसिक आधार देण्याच्या नावाखाली त्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.
अमावास्या, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार हे दिवस या भोंदूबाबांसाठी जणू ‘कमाईची पर्वणी’ ठरत आहेत. पहाटेपासूनच त्यांच्या तथाकथित दरबारांमध्ये गर्दी उसळत असून, घरासमोर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. श्रद्धाळू नागरिक आपल्या अडचणींचा पाढा वाचत असताना, करणी-भाक बांधणी, भूतबाधा काढणे, अंगात येणे, लिंबू-धागा, अंगारा, उतारा यांसारख्या अघोरी उपायांचे सत्र राबविले जाते.
या प्रक्रियेतून हजारो रुपयांची माया गोळा केली जात असून, अनेक भोंदूबाबांनी ग््राामीण भागात आपले बस्तान घट्ट बसविले आहे. काही ठिकाणी गावातील ग््राामदेवतांपेक्षाही स्वतःचा प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. विशेष म्हणजे, या भोंदूगिरीच्या जाळ्यात केवळ अशिक्षित नागरिकच नव्हे, तर सुशिक्षित वर्गही अडकत असल्याचे वास्तव चिंताजनक आहे.
यामध्ये काही वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्ती आणि राजकीय पदाधिकाऱ्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याच्या चर्चांमुळे या प्रकाराला अधिक खतपाणी मिळत असल्याची टीका होत आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्यरत संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहून कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सामाजिक दृष्ट्या घातक ठरत असलेल्या या भोंदूगिरीच्या वाढत्या प्रस्थामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे. यावर प्रभावी प्रतिबंध होणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.