

पुणे: बालमनाला भावणारी, कल्पनाशक्तीला पंख देणारी आणि संस्कारांची बीजे रोवणारी बालरंगभूमीवरील बालनाट्ये आजही तितकीच महत्त्वाची असली, तरी पुण्यातील बालनाट्यांची वाटचाल मात्र पुण्यापुरतीच मर्यादित असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. विषयवैविध्य, प्रयोगशीलता आणि तांत्रिक सादरीकरणाच्या बाबतीत बालनाट्यांचा दर्जा उंचावला आहे. पण, आर्थिक अडचणी आणि व्यवस्थापनातील अडथळ्यांमुळे या नाटकांचे प्रयोग पुण्याबाहेर नेणे निर्मात्यांसाठी कठीण बनले आहे.
पुण्यातील केवळ दोन ते तीन टक्के बालनाट्यांचेच दौरे पुण्याबाहेर होत आहेत. आर्थिक गणित हा सर्वांत मोठा अडथळा असल्याचे नाट्यनिर्माते, दिग्दर्शक सांगतात. काही नाट्य संस्था आणि नाट्यनिर्मात्यांकडून वर्षभर बालनाट्यांचे प्रयोग सादर केले जात आहेत, तर अनेक संस्था आणि निर्माते विशेषतः मे ते जुलै या उन्हाळी सुटीच्या कालावधीतच प्रयोगांवर भर देत आहेत. या काळात पर्यावरण, विज्ञान, इतिहास, सामाजिक विषय आणि मुलांच्या भावविश्वाशी निगडित विविध आशय असलेली नाटके बालरंगभूमीवर येत आहेत.
एका बालनाट्याचा पुण्यातीलच प्रयोग सादर करण्यासाठी साधारणपणे 40 ते 50 हजार रुपये खर्च येतो. त्यातच जर बाहेरगावी प्रयोग करायचा ठरवला, तर प्रवास, कलाकारांचे मानधन, नेपथ्य, निवास व्यवस्था, नाट्यगृह भाडे, जाहिरात आणि व्यवस्थापन या सर्वांचा एकत्रित खर्च 60 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत पोहोचतो. एवढा खर्च उचलून त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळेल, याची खात्री नसल्याने पुण्यातील संस्था आणि नाट्यनिर्माते जोखीम पत्करण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. मुलांनी आणि पालकांनी अधिकाधिक प्रमाणात बालनाट्यांकडे वळणे, तसेच प्रायोजकांनी या क्षेत्रात गुंतवणूक करावी, असे निर्माते, दिग्दर्शकांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात बालनाटकांचे दिग्दर्शक - निर्माते देवदत्त पाठक म्हणाले, मुंबईतील नाट्यनिर्माते बालनाट्यांच्या प्रयोगांसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात. दुसऱ्या जिल्ह्यात एका प्रयोगासाठीचा खर्च मोठा आहे. त्यामुळे पुण्यातील निर्मात्यांना बालनाट्यांचे दौरे करणे परवडणारे नाही. परिणामी, ही नाटके प्रामुख्याने स्पर्धा आणि महोत्सवांपुरतीच मर्यादित राहतात. यंदाही अशीच परिस्थिती दिसून येत आहे. शाळांना सुट्या उशिरा लागल्याने नाट्यप्रयोगांचे नियोजन विस्कळीत होते. नाट्यगृहांच्या तारखा मिळविणे, कलाकारांची उपलब्धता आणि आर्थिक नियोजन या सर्व गोष्टींवर त्याचा परिणाम होतो. यंदाही सुट्या उशिरा लागल्यामुळे बालनाट्यांच्या प्रयोगांची संख्या घटली आहे.
पुण्यातील बालनाट्यांचा दर्जा नक्कीच उंचावला आहे. विषय आणि सादरीकरणाच्या बाबतीत आम्ही प्रयोगशीलता दाखवत आहोत. मात्र, खर्च प्रचंड वाढला आहे. पुण्यातील एका प्रयोगासाठीच 40 ते 50 हजार रुपये खर्च येतो. अशा परिस्थितीत बाहेरगावी दौरे करणे परवडणारे नाही. मुंबईतील निर्मात्यांना आर्थिक पाठिंबा मिळतो. त्यामुळे त्यांना दौरे करणे शक्य होते. पण, आमच्यासाठी जाहिरात ते प्रवास या सर्वांचा खर्च पेलणे कठीण जाते. त्यामुळे अनेक चांगली नाटके पुण्याबाहेर पोहोचतच नाहीत.
सागर लोधी, बालनाटकांचे दिग्दर्शक