

मंचर: राज्यात सुरू असलेल्या बांधकामांना सध्या मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू या राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि सणांमुळे परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात मूळ गावी परतले आहेत. परिणामी, विशेषतः इमारत बांधकाम क्षेत्राला मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे.
उन्हाळ्याच्या काळात राज्यभरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असतात; मात्र, सध्या कामगारांची कमतरता जाणवत आहे. निवडणूक प्रचार व मतदानासाठी स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी कामगारांना गावी बोलावल्याने अनेक कामगार साधारण महिनाभरापासून गैरहजर आहेत. कामगारांना प्रचारासाठी दररोज सुमारे 1 हजार रुपये आणि मतदान करण्यासाठी 5 हजार रुपये मिळत असल्याने, तसेच प्रवासाचा खर्चही दिला जात असल्याने ते गावी गेल्याचे कामगारांनी सांगितले.
दरम्यान, या राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतर बुधवारी (दि. 27) बकरी ईद हा सण साजरा करूनच कामगार परत येणार असल्याचेही समजते. त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील कामे मंदावली असून, सिमेंट, स्टील व इतर बांधकाम साहित्याच्या विक्रीवर देखील परिणाम झाला आहे. कामगार परतल्यानंतरच या कामांना गती येईल, तोपर्यंत क्षेत्रावर मर्यादित परिणाम कायम राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कामगार मोठ्या प्रमाणात गावी गेल्याने सिमेंट, स्टील आणि इतर साहित्यांच्या मागणीत काही प्रमाणात घट झाली आहे. निवडणुका व सणानंतरच बाजारात पुन्हा हालचाल वाढेल, तोपर्यंत व्यवसायावर मर्यादित परिणाम जाणवत राहणार आहे.
वैभव आणि गौरव दिलीप शिंदे, शिंदे सेल्स कॉर्पोरेशन, अवसरी फाटा
सध्या कामगार उपलब्ध नसल्याने अनेक बांधकामे ठप्प झाली आहेत. नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करणे कठीण होत आहे. कामगार परत आल्यानंतरच कामांना वेग येईल.
संजय पवळे, पंचायत समिती सदस्य, पेठ