Ethanol approval to increase maize farming area
पुणे: राज्य सरकारने नुकतेच धान्यांपासून इथेनॉल निर्मितीच्या धोरणास केंद्र सरकारप्रमाणेच मान्यता दिल्याने इथेनॉल उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा आहे. शिवाय ऊस पिकाखाली 12 ते 14 महिने शेत अडकून पडते.
त्या ऐवजी साडेतीन ते चार महिन्यात मका पीक घेण्यामुळे कमी दिवसांत वाजवी दर मिळण्याच्या शक्यतेने मका लागवडीतही लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भविष्यात सोयाबीन, कापूस आणि ऊस पिकाखालील पेरणी, लागवड कमी होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचेही सांगण्यात आले. (Latest Pune News)
राज्यात ऊस पिकाखालील सरासरी क्षेत्र 10 ते 11 लाख हेक्टरच्या आसपास राहते. तर मका पिकाचे सरासरी क्षेत्र 9.33 लाख हेक्टरइतके असले तरी अलीकडील काही वर्षात क्षेत्र सतत वाढत आहे. यंदा तर मक्याची तब्बल 13.84 लाख हेक्टर क्षेत्रावर उच्चांकी पेरणी पूर्ण झाल्याचे कृषी विभागाच्या ताज्या पेरणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
पशुखाद्य आणि पोल्ट्री उत्पादकांच्या मागणीसह आता इथेनॉल बनविण्यासाठी मका पिकाला मोठी संधी निर्माण झाली आहे. खरिपातील प्रमुख पिकांपैकी सोयाबीन पिकाखाली 48 लाख हेक्टर तर कापूस पिकाखाली 38 लाख हेक्टरइतके मोठे क्षेत्र आहे.
साखर कारखान्यांकडून साखर, साखरेचा पाक, ऊसाचा रस, बी-हेवी मळी, सी-हेवी मळी आदींपासून इथेनॉलचे प्रकल्प कार्यान्वित आहेत. आता धान्यांपासून दुहेरी स्त्रोत पध्दतीने इथेनॉल निर्मिती धोरणामुळे साखर उद्योगासही एकप्रकारे बळकटी मिळणार आहे. कारण ऊसगाळप संपल्यानंतर उर्वरित कालावधीत साखर कारखान्यांच्या डिस्टिलरीज वर्षभर चालू शकणार आहेत.
केंद्र सरकारप्रमाणेच राज्य सरकारने धान्यांपासून इथेनॉल तयार करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना ऊसगाळप संपल्यानंतर उर्वरित शिल्लक दिवसांमध्ये इथेनॉलचे उत्पादन घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पांची उभारणी होण्यास म्हणजे ऊसाप्रमाणेच धान्यांपासून इथेनॉल तयार करण्यासाठी मल्टीफिड डिस्टलरीजची उभारणी होण्यास सुमारे एक वर्षाचा अवधी जाईल. त्यामुळे साखर उद्योगास आणखी पाठबळ मिळून कारखाने बाराही महिने चालू शकतील.- अजित चौगुले, व्यवस्थापकीय संचालक, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा), पुणे.
शेतकर्यांकडून नेहमीच पिकांची फेरपालट करण्यास प्राधान्य दिले जाते. मक्याचे पीक सरासरी तीन ते चार महिन्यात निघते. इथेनॉल प्रकल्पांसाठी अन्य राज्यांतून महाराष्ट्रातील मक्यास मागणी वाढत आहे. राज्यातच जर साखर कारखान्यांकडून अथवा डिस्टलरीमध्ये धान्यांपासून इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित झाल्यास मक्याच्या मागणीत आणखी वाढ अपेक्षित आहे. शिवाय पोल्ट्री उद्योगाकडून हमखास मागणी राहत असल्याने मका लागवडीखालील क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे.- वैभव तांबे, मुख्य सांख्यिक, कृषी आयुक्तालय, पुणे.