पुणे : पुढारी वृत्तसेवा
राज्यात 31 मार्च 2022 अखेरच्या निवडणुकीस पात्र असणार्या सुमारे नव्वद टक्के विकास सोसायट्यांच्या निवडणुका सुरू असून, काही पूर्णही झाल्या आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या मतदार असलेल्या या सोसायट्यांमुळे स्थगित करण्यात आलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग जवळपास मोकळा
झाला आहे.
प्राथमिक मतदार याद्यांचा कार्यक्रम 15 जूनपासून अर्हता दिनांक (कट ऑफ डेट) निश्चित करून सुरू होण्याची अपेक्षा असून, जवळपास 307 पैकी 292 बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल ऐन पावसाळ्यात किंवा दिवाळीनंतर वाजण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याचिका क्रमांक 11669/2021 आणि 14 संलग्न याचिकांमध्ये 18 नोव्हेंबर 2021 रोजी दिलेल्या आदेशात बाजार समित्यांसाठी मतदार असलेल्या विकास सोसायट्यांच्या निवडणुका प्राधान्याने घ्या, असे म्हटले होते. त्यानुसार राज्यात पहिल्या, दुसर्या आणि तिसर्या टप्प्यात 31 मार्च 2022 अखेरीस निवडणुकीस पात्र असणार्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुरुवात झाली.
त्यानुसार निवडणुका घेणे क्रमप्राप्त असलेल्या सुमारे 17 हजार 926 विकास सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याचे नियोजन राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून करण्यात आले आणि त्यानुसार प्राधिकरणाच्या ताज्या अहवालानुसार सुमारे 16 हजार 292 विकास संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत आल्या आहेत. म्हणजेच, 90 टक्के सोसायट्यांच्या निवडणुका जवळपास पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे रखडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती निवडणूक प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली.
केवळ निवडणूक निधी नसल्यामुळे सुमारे 1 हजार 634 विकास सोसायट्यांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातील सोसायट्या अधिक आहेत. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार वेळेच्या बंधनात विकास सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याचे बंधन होते. त्यानुसार विकास सोसायट्यांच्या निवडणुकांचा आढावा येत्या आठवड्यात होण्याची अपेक्षा आहे.