पुणे: इराणचे दुबईतील अमेरिकी तळावर झालेले हवाईहल्ले परतविण्यात संरक्षक यंत्रणेला रात्री चांगले यश आले. या हल्ल्यात नष्ट झालेल्या क्षेपणास्त्रांचे तुटके भाग पडल्याने रात्री काही इमारतींचे नुकसान झाले असले, तरी आज दुबईतील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. येथील जनजीवन, मॉल्स, पेट्रोल पंप नेहमीप्रमाणेच सुरू आहेत. प्रशासन नागरिकांची पुरेपूर काळजी घेत आहे, अशी माहिती दुबईस्थित भारतीय व्यावसायिक आणि गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमचे सदस्य हर्षद पाटील यांनी दै. ’पुढारी’शी बोलताना दिली.
मुळचे निगडी येथील रहिवासी असलेले हर्षद पाटील गेल्या आठ वर्षांपासून दुबईत राहत असून, तेथे त्यांचा ट्रेडिंग आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. ते म्हणाले, सध्या घरूनच काम करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या असून, शाळाही घरूनच ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. हवाई क्षेपणास्त्रहल्ल्यामुळे दुबई विमानतळावर थोडीशी मोडतोड झाल्याचे समजते. मात्र, इतरत्र फारसे नुकसान झालेले नाही. रात्री आकाशात दिसलेल्या ज्वाळांमुळे दुबईतील सुरक्षा यंत्रणा भक्कम असल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे आम्ही सुरक्षित आहे.
मोबाईलवरच मिळतोय धोक्याचा इशारा
हर्षद पाटील म्हणाले, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येथील प्रशासकीय यंत्रणा खूपच अलर्ट आहे. येथील रहिवासी असलेल्या प्रत्येक नागरिकाला मोबाईलवरच मेसेजच्या माध्यमातून धोक्याचा इशारा मिळत आहे. प्रत्येक नागरिकाला मोबाईलवर प्रशासनाचा एक मेसेज येतो. मेसेज आला की मोबाईल जोरजोराने व्हायबेट होतो अन् अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या जातात.