पुणे

उपायुक्तांचा अतिक्रमणांवर हातोडा; वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न कायम

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रस्त्यावरील फळे, भाज्या विक्रेत्यांचे व विक्रेत्या टेम्पोंच्या अतिक्रमणासंदर्भात दैनिक 'पुढारी'ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून, परिमंडळ तीनच्या उपायुक्त आशा राऊत रात्री दहा वाजता स्वतः रस्त्यावर उतरून अतिक्रमण करणार्‍या व्यावसायिकांवर जप्तीची कारवाई केली. तसेच या ठिकाणी कायमचे कारवाई पथक तैनात करण्याच्या सूचना केल्या आहेत.

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेने राजाराम पूल चौक ते फन टाईम थिएटर या दरम्यान उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी पुरेसा रस्ता उपलब्ध नसल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. असे असताना सुद्धा अरुंद व अडचणीच्या ठिकाणी रात्री पदपथ सोडून भाजी व फळे विक्रणारे रस्त्यावर व्यवसाय थाटतात. तसेच फळे- भाज्यांचे टेम्पोही वाहतूक कोंडीत असतानाही रस्त्याच्या कडेला उभे राहून बिनदास्तपणे व्यवसाय करतात. त्यांचे लोक कर्णकर्कश स्पिकर हातात घेऊन रस्त्याच्या मधेच उभे राहतात. यामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होते.

या परिस्थितीवर दैनिक पुढारीने प्रकाश टाकल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई केली. परिमंडळ (झोन) तीनच्या उपायुक्त आशा राऊत यांनी रात्री दहा वाजता सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदिप खलाटे यांच्यासह सिंहगड रस्त्याची पाहणी केली. या पाहणीत अतिक्रमण करणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई करत माल जप्त केला. यावेळी क्षेत्रिय अतिक्रमण निरीक्षक उमेश नरुले, अतिक्रमण निरीक्षक अजय गोळे अन्य 5 सहा. अतिक्रमण निरीक्षक, 10 एमएसएफ जवान, 3 पोलिस स्टाफ हजर होता.

रस्त्याच्या कडेलाच पार्किंग

दैनिक पुढारीच्या वृत्तानंतर माणिकबाग चौक ते विठ्ठलवाडी या दरम्यान रस्त्याच्या कडेला पार्किंग करण्यात येणार्‍या चारचाकी गाड्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.

पानमळा ते पु. ल. देशपांडे उद्यान परिसरातील पथारी व्यावसायिकांची लायसन्स व येणार्‍या समस्या त्यांनी पाहणी केली व अतिक्रमण त्या ठिकाणी होणार नाही, याबाबत सूचना दिल्या. साधारण सहा फळ पथारी व भाजीपथारी जप्त केल्या. तसेच राजाराम पुलाजवळ उड्डाणपुलाच्या कामामुळे जेथे बॉटल नेक तयार होतो. त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला भाजी, फळे व इतर वस्तू विखरून विकल्या जातात. या ठिकाणीही कारवाई करून माल जप्त करण्यात आल्या.

– आशा राऊत, उपायुक्त, परिमंडळ तीन, महापालिका.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT