पुणे: मागील काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील ऐतिहासिक आणि गजबजलेल्या चांदणी चौक परिसरात मोठा बॉम्बस्फोट घडविण्याचा कट पुण्यातून रचला गेल्याची धक्कादायक माहिती ८ फेब्रुवारी रोजी दुपारी दिल्ली पोलिसांना एका अनोळखी व्यक्तीने फोनवरून दिली. आणि काही मिनिटांतच राजधानीतील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्या. मात्र प्रत्यक्षात चौकशी वेगेळाच प्रकार समोर आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फोनवरील व्यक्तीने दिल्ली पोलिसांना फोन करून पुण्यातील बुधवार पेठेतील एका हॉटेलमधून दिल्लीतील चांदणी चौकत मागे झालेल्या स्फोटाचा कट रचण्यात आल्याची व संबंधित हॉटेल मालकाला यासाठी तब्बल २० कोटी रुपये मिळाले असल्याची माहिती फोनद्वारे दिल्ली पोलिसांना दिली. तसेच हॉटेल मालकाच्या घरात अद्यापही बॉम्बनिर्मितीसाठी वापरले जाणारे आरडीएक्सचा बॉक्स ठेवलेला आहे, असा सनसनाटी दावा त्या व्यक्तीने फोनवर केला.
माहितीची गंभीरता लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी तात्काळ एनआयएला सतर्क केले. काही क्षणांतच तपासाची सूत्रे वेगाने फिरू लागली. दिल्लीहून थेट पुणे पोलिस आयुक्तालयाशी संपर्क साधण्यात आला. ‘पुणे कनेक्शन’चा धागा समोर येताच स्थानिक पोलिसांनीही तांत्रिक तपास सुरू केला. कॉलचा स्त्रोत शोधण्यासाठी सायबर पथक कामाला लागले. नंबर ट्रेस होताच पुण्यातील एका घरापर्यंत तपास पोहोचला. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. काही तासांच्या धावपळीनंतर चित्र हळूहळू स्पष्ट झाले.
संपूर्ण घटनाक्रमाला अनपेक्षित कलाटणी मिळाली. चौकशीत कॉल करणारी व्यक्ती कोविडकाळात याच हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होती. मात्र विचित्र वर्तनामुळे त्याला कामावरून कमी करण्यात आले होते. त्या रागातूनच त्याने हॉटेल मालकाला अडचणीत आणण्यासाठी ही बनावट माहिती पसरवल्याचे उघड झाले. याहून धक्कादायक बाब म्हणजे संबंधित व्यक्तीची मानसिक स्थिती स्थिर नसल्याचेही तपासात निष्पन्न झाले. यापूर्वीही त्याने अशाच प्रकारचे दिशाभूल करणारे फोन करून पोलिसांना त्रास दिल्याच्या तक्रारी होत्या.
अखेरीस, दिल्ली ते पुणे सुरक्षा यंत्रणांना काही तास धावपळ करायला लावणारा ‘बॉम्बस्फोटाचा कट’ हा केवळ एका माथेफिरूच्या सूडबुद्धीतून केलेला खोटा कॉल असल्याचे स्पष्ट झाले. कायदेशीर तरतुदीनुसार त्याची चौकशी करून कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र एका फोनने निर्माण केलेला थरार आणि शेवटी उघड झालेला प्रकार याने यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडवली.