पुणे

विश्वस्त निवडीत डावलल्याने मोर्चा : आळंदीकर आक्रमक

Laxman Dhenge

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : आळंदीत यंदाच्या कार्तिकी वारीची सुरुवात ही ग्रामस्थांनी पुकारलेल्या बंदने झाल्याचे दिसून आले. एकीकडे राज्यभरातून दाखल होत असलेले वारकरी, भाविक आणि दुसरीकडे बंद असलेली दुकाने, असे चित्र मंगळवारी (दि. 5) सकाळी होते.
संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान विश्वस्तपदांच्या निवडीत स्थानिकांना डावलण्यात आल्याने आळंदीकरांनी आक्रमक पवित्रा घेत मंगळवारी आळंदी बंदची हाक दिली होती. कार्तिक वद्य अष्टमीनिमित्त सकाळी नऊ वाजता श्रीगुरू हैबतबाबा पायरी पूजन सोहळा मोठ्या भक्तिभावाने झाल्यानंतर आळंदीकर ग्रामस्थांनी बंद पुकारला.

या वेळी गावातील सर्व दुकाने, आस्थापना सकाळी दहा वाजल्यापासून बंद ठेवण्यात आल्या होत्या. सकाळी अकरा वाजता चाकण चौक येथून निषेध मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा प्रदक्षिणा मार्गावरून महाद्वार चौकात आला. या वेळी मोर्चाचे निषेध सभेत रूपांतर झाले. या वेळी नीलेश महाराज लोंढे, माजी नगराध्यक्ष बबनराव कुर्‍हाडे, माजी विरोधी पक्षनेते डी. डी. भोसले पाटील, माजी नगरसेवक प्रकाश कुर्‍हाडे, अशोक उमरगेकर, साहेबराव कुर्‍हाडे, संजय घुंडरे, राहुल चव्हाण आदी उपस्थित होते.

दुपारनंतर बंद शिथिल

बंद काळात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारनंतर आळंदी बंद शिथिल झाल्याचे दिसून आले. या वेळी सर्व आस्थापना सुरू झाली. भगवान श्री पांडुरंग, संत नामदेव महाराज, भक्त पुंडलिक यांच्या पालख्यांचे मंगळवारी आळंदीत आगमन होणार आहे. येणार्‍या भाविकांची आळंदीत कसलीही गैरसोय होणार नाही, याची काळजी आळंदीकरांनी घेतली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT