पुणे: कात्रजमधील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील 16 चितळ मृत्युमुखी पडल्याची घटना नुकतीच घडली होती. ओडिशातील प्रयोगशाळेच्या अहवालानुसार या चितळांचा मृत्यू लाळ खुरकत या विषाणूजन्य आजारामुळे झाला असल्याचे समोर आले आहे.
या घटनेची गंभीर दखल महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतली असून, त्यांनी मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, येत्या चार दिवसांत त्यांना याचा अहवाल देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. (Latest Pune News)
राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात 7 ते 12 जुलैदरम्यान 16 चितळांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. मृत चितळांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी विविध शासकीय संस्थांना समाविष्ट केले होते. क्रांतीसिंह नानासाहेब पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ आणि विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन येथील तज्ज्ञांच्या चमूने मृत प्राण्यांचे शवविच्छेदन करून जैविक नमुने गोळा केले होते.
हे नमुने राष्ट्रीय लाळ खुरकत संशोधन केंद्र, भुवनेश्वर (ओरिसा), भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था, बरेली, विभागीय वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र, नागपूर आणि राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग शाळा, भोपाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी भुवनेश्वर येथील प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालानुसार प्राण्यांची लक्षणे आणि प्रयोगशाळा तपासणी अहवाल जुळल्याने मलाळ खुरकतफ या विषाणूजन्य आजाराचे संक्रमण झाल्याचे निदान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी संग्रहालयातील प्राण्यांची काळजी व्यवस्थित घेतली जाते का? कामात काही कुचराई केली जाते का? असे विविध प्रश्न उपस्थित करून या संदर्भात संग्रहालयातील अधिकार्यांकडून त्यांनी खुलासा मागवला आहे.
याबाबत मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांना त्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याबाबतचा अहवाल येत्या चार दिवसांत देण्याचे आदेशदेखील आयुक्त नवल किशोर राम यांनी या दोन्ही अधिकार्यांना दिले आहेत. या अहवालात जर प्राणिसंग्रहालय अधिकारी व कर्मचारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
... त्यामुळे वाढते मृत्यूचे प्रमाण
चितळ प्राण्यांच्या मृत्यूचे प्राथमिक कारण लाळ खुरकत विषाणू संसर्ग हेच होते. अशा विषाणू संसर्गादरम्यान प्राण्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि पावसाळी प्रतिकूल वातावरणामुळे त्यांची ताण पातळी वाढते, त्यामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक असते.
राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात चितळांच्या मृत्यूनंतर महापालिका आयुक्तांनी प्राणिसंग्रहालयातील अधिकार्यांना याबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. हा खुलासा आल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.- ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा