खोर: दौंड तालुक्यातील खोर परिसरात उन्हाळ्याची तीवता वाढत असून, शेतकऱ्यांसमोर पाण्याचे गंभीर संकट उभे ठाकले आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणारा डोंबेवाडी पाझर तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. तसेच, पद्मावती तलाव आणि फरतडेवस्ती तलावातील पाणीसाठाही संपल्याने परिसरात तीव पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यामुळे शेतीसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.
खोर गाव अंजीर उत्पादनासाठी ओळखले जाते. येथे मोठ्या प्रमाणात अंजीरबागा असून, येत्या 15 मेपासून छाटणीचा हंगाम सुरू होणार आहे. या काळात बागांना वेळेवर पाणी मिळणे अत्यावश्यक असते. मात्र, सध्याच्या पाणीटंचाईमुळे यंदाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
सध्या परिसरातील ओढे, नाले, विहिरी आणि अन्य जलस्रोत आटले असून, शेततळ्यांतील उरलेला पाणीसाठाही झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेतून फरतडेवस्ती तलावात आवर्तन सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी आर्थिक वर्गणी जमा करण्यास सुरुवात केली आहे.
तसेच, पुरंदर उपसा योजनेतून डोंबेवाडी पाझर तलावात आणि जनाई-शिरसाई योजनेतून पद्मावती व फरतडेवस्ती तलावात तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी करण्यात येत आहे. पाणी प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास अंजिरासह इतर पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत असून, प्रशासनाने त्वरित आवर्तन सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
बंदिस्त पाइपलाइन योजनेबाबत नाराजी
पुरंदर जलसिंचन उपसा योजनेतून डोंबेवाडी पाझर तलावात बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा करण्याची घोषणा अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. केवळ आश्वासनांवरच योजना अडकली असून, ती तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी जोर धरत आहे.