सुनील जगताप
पुणे: नारळाचे उत्पादन करणार्या शेतकर्यांनी कमी केलेल्या उत्पन्नाची, गणेशात्सवाच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली आहे. तसेच गोटा खोबरे आणि खोबरेल तेल कंपन्यांकडून मागणी वाढलेली आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात आलेल्या नारळाच्या भावामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 80 ते 90 टक्क्यांनी वाढ झाली असून आवकही घटली आहे.
गणेशोत्सव सुरू असल्याने पूजा आणि तोरणासाठी नारळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुणे परिसरातच उत्सव काळात दररोज दीड ते दोन लाख नारळांची विक्री होत असून, संपूर्ण कालावधीत 12 ते 15 लाख नारळांची विक्री होते. (Latest Pune News)
या मागणीमुळे किरकोळ बाजारात एका नारळाची किंमत दर्जानुसार 40 ते 50 रुपयांवर पोहचली आहे. अनियमित हवामानामुळे नारळाच्या उत्पादनात देशभरात तब्बल 25 टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे नारळांच्या दरात मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ झाल्याने ग्राहकांना नारळ महाग पडत आहे.
पुणे परिसरातच उत्सव कालावधीत दररोज एक ते दीड लाख नारळांची विक्री होत आहे. किरकोळ विक्रेत्यांकडून 25 ते 30 टक्क्यांनी मागणीत वाढ झाली आहे. ही मागणी आता दिवाळीपर्यंत कायम असणार आहे.
मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज दीड ते दोन हजार पोती नारळांची आवक होत आहे. एका पोत्यात शंभर नारळ असतात. मार्केट यार्डातून पुणे शहर, उपनगर आणि जिल्ह्यातील ग्राहक नारळाची खरेदी करत आहेत.
गणेशोत्सवात हॉटेल व्यावसायिकांकडूनही मागणी
गणेशोत्सवात भक्तिभावाने भाविक गणरायाला तोरण अर्पण करतात. तोरणासाठी तमिळनाडूतील नारळाचा वापर केला जातो. यंदा नव्या नारळाच्या मागणीत वाढ झाली आहे. उत्सवाच्या कालवधीत पुणे येथे देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात. खाद्यपदार्थ विक्रीत मोठी वाढ होते. हॉटेल व्यावसायिक, केटरिंग व्यावसायिक तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून नारळांच्या मागणीत वाढ झाली आहे. सापसोल, मद्रास या जातीच्या नारळांचे खोबरे चवीला गोड असते. खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी सापसोल आणि मद्रास जातीच्या नारळांना मागणी असते.
... येथून होते आवक
महाराष्ट्रात आंध्र प्रदेशातून पालकोल नारळाची, तर कर्नाटकातून सापसोल आणि मद्रास नारळाची बाजारात आवक होत आहे. तमिळनाडूमधून नवा नारळाची आवक होते.
दरवाढीची कारणे
देशभरात नारळाचे उत्पन्न 30 टक्क्यांनी घटले. मागील वर्षात नारळाच्या निर्यातीत वाढ. तेल उत्पादक कंपन्यांकडून मागणी जास्त. अनेक शेतकर्यांनी नारळाच्या बागा काढून टाकल्या. गोटा खोबर्याला प्रचंड मागणी. सततच्या पावसामुळे नारळावर कीटकांचा प्रादुर्भाव. येणार्या सणांमुळे मागणीत प्रचंड वाढ. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानमधून नारळाला मागणी.
सण आणि उत्सव सुरू असल्याने नारळाला चांगली मागणी असून दिवाळीपर्यंत मागणी कायम असणार आहे. कीटकांचा प्रादुर्भाव आणि अनियमित हवामान उत्पादन यामुळे नारळाचे उत्पन्न घटले आहे. आगामी काळातही नवरात्र उत्सव येत आहे. तो संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. त्यामुळे नारळाची आणखीन मागणी वाढेल.- दीपक बोरा, नारळाचे व्यापारी, मार्केटयार्ड
बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत नाराळाची आवक कमी झालेली आहे. मद्रास नारळाची प्रामुख्याने घरगुती आणि हॉटेल व्यावसायिकांकडून जास्त मागणी आहे. तर नवा नारळाची पूजा आणि इतर प्रकारासाठी जास्त मागणी आहे. आवक घटल्याचा परिणाम दरवाढीवर झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत दर जास्त आहेत. आगामी काळात हे दर तेजीतच राहण्याची शक्यता आहे.- ज्योतीकुमार आगरवाल, नारळाचे व्यापारी