पुणे: चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्ते, वाहतूकक कोंडी आणि पायाभूत सुविधांशी संबंधित समस्या प्राधान्याने सोडवण्यात येतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्योजकांना दिले. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी चाकण येथील उद्योजक, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चाकण नागरी कृती समिती आणि औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी धनंजय शेडबाळे यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. या वेळी चाकण एमआयडीसीतील उद्योगांना भेडसावणाऱ्या विविध समस्या जाणून घेत त्यांनी त्या तातडीने सोडवण्याबाबत आश्वस्त केले.
चाकण एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत विस्तारली असून, त्यानुसार रस्ते आणि वाहतूकव्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि अन्य पायाभूत सुविधांच्या प्रश्नांमुळे उद्योजक तसेच कामगारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना
समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री पवार यांनी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमआरडीएचे आयुक्त अभिजित चौधरी, जि. प.चे सीईओ गजानन पाटील, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, खेडचे प्रांताधिकारी अनिल दौंडे आणि चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि स्थानिक प्रशासनाला विश्वासात घेऊन सर्व प्रश्नांवर लवकरच मार्ग काढण्यात येईल. उद्योगांच्या विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा सक्षम करण्याला प्राधान्य दिले जाईल, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.