पुणे

खर्‍या नायकांच्या शौर्यगाथा कळायला हव्यात : लष्करप्रमुख जन. नरवणे

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

'परमवीरचक्राने सन्मानित योद्ध्यांच्या स्मृती जागविणार्‍या राष्ट्रीय एकात्मता उद्यानाचे उद्घाटन करताना मला आनंद होत असून, खर्‍या नायकांच्या शौर्यगाथा येणार्‍या युवा पिढ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे; ज्यायोगे देशाच्या सीमांचे रक्षण करणार्‍या सैनिकांच्या कामगिरीचे महत्त्व अधोरेखित होईल,' असे प्रतिपादन भारतीय सेनादलाचे प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी बुधवारी केले.

असीम फाउंडेशनने गंगोत्री होम्स अँड हॉलिडेजच्या सहकार्याने कॅश्युरिना, भोर येथे साकारलेल्या राष्ट्रीय एकात्मता उद्यानाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. असीम फाउंडेशनचे संस्थापक सारंग गोसावी व्यासपीठावर होते. परमवीरचक्राने सन्मानित 21 सैनिक ज्या युद्धभूमीवर लढले, त्या प्रत्येक युद्धभूमीवरील माती एका कलशात या उद्यानात आणण्यात आली असून, त्या कलशाचे पूजन आणि राष्ट्रीय एकात्मता उद्यानाच्या कोनशिलेचे अनावरण जनरल नरवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

अनोख्या संकल्पनांचे काैतुक

युवकांना देशविघातक कार्यापासून परावृत्त होण्यास मदत, असीम फाउंडेशनच्या वतीने सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांसाठी चालविले जाणारे शैक्षणिक उपक्रम, युवकांसाठी करीत असलेल्या कार्याविषयी, तसेच राष्ट्रीय एकात्मता उद्यानाची उभारणी या अनोख्या संकल्पनेचे कौतुक करून नरवणे म्हणाले, 'भारतीय सैन्यदलात विविधतेत एकता दिसून येत असून, तीच खरी देशाची ताकद आहे. अशा विविध उपक्रमांमुळे सीमावर्ती भागातील युवक देशविघातक कारवायांपासून दूर राहत असून, त्यांना योग्य दिशा मिळत आहे. 1971 मधील युद्धात पाकिस्तानवर मिळविलेल्या विजयाला 50 वर्षे पूर्ण झाली. देशातील प्रत्येक नागरिक भारतीय सैन्यदलाला प्रत्येक कठीण प्रसंगात पाठिंबा देत असल्यामुळे सैन्यदलाचे मनोधैर्य उंचावत आहे.'

जनरल नरवणे यांच्या हस्ते सीमावर्ती भागातील जम्मू-काश्मीर, आसाम व लेहमधील उद्योजिका आणि विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला. या वेळी असीम फाउंडेशनचे सल्लागार सचिन गाडगीळ, संस्कृती बापट, सई बर्वे, निरुता किल्लेदार, गणेश जाधव, मकरंद केळकर, राजेंद्र आवटे उपस्थित होते. मेजर जनरल विक्रांत नाईक, एअर चीफ मार्शल भूषण गोखले (सेवानिवृत्त), ज्ञानप्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट यांची विशेष उपस्थिती होती. डॉ. स्वानंदी केळकर यांनी गायलेल्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

सामाजिक संस्थांचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत जायला हवे

'सीमावर्ती भागात काम करणार्‍या संस्थांविषयी, त्यांच्या कार्याविषयी पुरेशी आणि योग्य माहिती नसल्याने जनसामान्यांच्या मनात काही गैरसमजुती आहेत. देशातील युवकांना अशा स्वरूपाच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, याविषयी ज्ञात करणे गरजेचे आहे,' असेही मनोज नरवणे यांनी कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

मी 'ज्ञानप्रबोधिनी'चा विद्यार्थी

'लष्कराच्या सर्वोच्च पदावर असलो, तरी आयोजकांकडून माझी एक ओळख करून देणे राहून गेले. मी 'ज्ञानप्रबोधिनी'चा विद्यार्थी आहे. अनेक पुरस्कार अनेक सन्मान झालेले असले, तरी मी ज्ञानप्रबोधिनीचा विद्यार्थी आहे, हे माझे भाग्य समजतो,' अशा शब्दांत मनोज नरवणे यांनी बुधवारी पुणेकरांशी संवाद साधला.

सकाळी 9.17 वाजता लष्करप्रमुखांचे हेलिकॉप्टर उतरले. लगेच जवानांच्या मदतीने कारमध्ये बसून त्यांनी राष्ट्रीय एकात्मता उद्यानाची पाहणी केली आणि बरोबर 9.40 वाजता ते व्यासपीठावर आले. तिथे येताच उभे राहून मानवंदना देणार्‍या पुणेकरांशी संवाद साधत त्यांनी बसण्याची विनंती केली अन् उपस्थितांची मने जिंकली. 'सुप्रभात… आपण उभे का? बसा बसा…' हे शब्द पुणेकरांनी त्यांच्या तोंडून ऐकले अन् त्यानंतर मूळचे पुणेकर असलेल्या नरवणे यांचे स्वागतही पुणेकरांनी तशाच थाटात आणि टाळ्यांच्या गजरात केले.

'21 परमवीरचक्र विजेत्यांची माहिती देणारे उद्यान असीम फाउंडेशनच्या सारंग गोसावी यांच्या टीमने उभे केले आहे. हे रिअल हिरो असून, त्यांचे कर्तृत्व जगाला वाचायला मिळणार आहे. मातृभूमीच्या संरक्षणासाठी जवान सदैव सीमेवर लढत असतो. जसा तो कुटुंबाची काळजी घेतो, त्यापेक्षाही जास्त तो सीमेवर आपल्या मातृभूमीची काळजी घेतो. त्यामुळेच देशात सुरक्षितता आहे. जवानांनी जम्मू-काश्मीर, लेह-लडाखसारख्या अवघड भागात अविस्मरणीय काम केले आहे,' असेही ते म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT