ज्ञानेश्वर भोंडे
पुणे : स्मार्टफोनच्या जमान्यात जास्त वेळ हेडफोनचा वापर करीत असाल, तर तुम्हाला वेळेआधीच कर्णबधिरत्व येण्याचा धोका आहे. त्यामुळं त्याचा वापर कमीत कमी करावा, असा सल्ला कान, नाक, घसातज्ज्ञ देतात.
बहिरेपणाबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 3 मार्च रोजी विश्व बहिरेपणा दिन पाळला जातो. त्याद्वारे बहिरेपणाबाबत समाजात जागृती करण्यात येते. सध्या हेडफोनसह कानातील इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर वाढला आहे. त्याचे दुष्परिणाम लगेच दिसून येत नसले, तरी ते कालांतराने दिसून येतील, असे तज्ज्ञांचे मत आहे. नवीन जन्माला येणार्या मुलांमध्ये आनुवंशिकता, गरोदरपणात आईला पहिल्या तीन महिन्यांत संसर्ग झाल्यास किंवा चुकीची औषधे दिल्यास कर्णबधिरता येऊ शकते.
आपण हेडफोन किंवा वायरलेस ब्लूटूथने बोलत असताना त्यातील इलेक्ट्रिक एनर्जी एअर प्लगद्वारे आपल्या कानात जाते. जे सातत्याने गाणे ऐकणे, बोलणे यासाठी या साधनांचा वापर करतात, त्यांच्या कानाच्या नसांवर त्याचा भार पडत असल्याने ते अकाली बधिर होण्याचाही धोका वाढला आहे.
पूर्वी साठी ते सत्तरीनंतर ऐकायला कमी यायचे. मात्र, आताच्या पिढीकडून हेडफोनचा वापर सतत होत असल्याने त्यांना 50 व्या वर्षीच कमी ऐकू येण्याची शक्यता वाढली आहे. हेडफोनचा व्यावसायिक कारणाव्यतिरिक्त वापर टाळावा. सध्या जे लोक टेलिफोन एक्स्चेंज, फोन ऑपरेटर, कॉल सेंटर येथे काम करतात; त्यांच्यात चिडचिड होणे, डोके दुखणे, कानात आवाज येणे, असा त्रास दिसून येत आहे. त्यासाठी विनाकारण हेडफोनचा वापर टाळावा.
– डॉ. मिहिर सूर्यवंशी, कान-नाक-घसा शल्यचिकित्सक