पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जगात पाचव्या क्रमांकाचा देश झाला आहे. येत्या काळात भारताची अर्थव्यवस्था 35 मिलीयन डॉलरची होईल अन् ती जगातील तिसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल. पारंपरिक व्यवसायाचे देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन केंद्रिय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयुष गोयल यांनी व्यक्त केले.
दि पूना मर्चंट्स चेंबरतर्फे व्यापार महर्षी स्व. उत्तमचंदजी ऊर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी दिला जाणारा "आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार" प्रदान सोहळा शनिवारी (दि. 25) पार पडला. या वेळी गोयल बोलत होते. सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ट्रेड सेंटर येथे पार पडलेल्या कार्यक्रमावेळी, ज्येष्ठ विधीज्ञ एस. के. जैन, लायन्सल क्लब इंटरनॅशनल झोन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजय भंडारी, चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, सचिव रायकुमार नहार, माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले, वालचंद संचेती, संचालक आशिष दुगड आदी उपस्थित होते.
या वेळी राज्यस्तरावरील पुरस्कार सांगलीचे अरुण दांडेकर यांना, तर पुणे जिल्हास्तरावरील पुरस्कार रमेश कोंढरे, शहरस्तरावरील पुरस्कार पुरुषोतम लोहिया यांना प्रदान करण्यात आला. दि पूना मर्चंट्स चेंबर सभासदांमधून देण्यात येणारा पुरस्कार राजेश शहा यांना, युवा व्यापारी पुरस्कार शुभम गोयल यांना व कै. वीरेन गवाडिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा आदर्श पत्रकार पुरस्कार पत्रकार प्रवीण डोके यांना देण्यात आला. मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हेही वाचा