माणिक पवार
नसरापूर: सबस्टेशन व -टाँवरलाईन हटाव संघर्ष समितीच्या वतीने आज रविवारी पुणे सातारा महामार्गावर कापूरहोळ चौक ( ता. भोर ) येथे हजारो शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू होते. त्यांच्या मागण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत संघर्ष समितीची बैठक तातडीने घेण्यात येईल या आशयाचे लेखी पत्र जिल्हाधिकारीकडून आल्याने तूर्तास आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
आंदोलन मागे घेतल्यानंतर वाहने सोडण्यात आली. किमान दोन तास वाहतूक सुरळीत होण्यासाठी वेळ लागणार असल्याचा अंदाज वाहतूक पोलिसांनी वर्तविला आहे. रस्ता रोको आंदोलनात सर्वच पक्षातील राजकी मान्यवर व मोठ्या संख्येने भोर आणि राजगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी हे बैलगाडी, ट्रॅक्टर व इतर वाहनासह रस्त्यावर ठिय्या मांडला होता.
यावेळी उपथित पोलिस अधिकाऱ्यांनी अटक असलेल्या चार शेतकऱ्यांना कायदेशीर प्रक्रिया करून तुरुंगातून सोडण्यात येणार असल्याची हमी दिली. तर अप्पर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी मुख्यमंत्र्यासम्मेत बैठक घेणार असल्याचे लेखी पत्र ई-मेल केल्याने संघर्ष हटव समितीच्या वतीने आंदोलन मागे घेतले आहे. सध्या आंदोलक महामार्गावरून सेवा रस्त्यावर बाजूला होत परतीच्या मार्गावर लागले आहे. तीन तासांच्या आंदोलनाचा फटका प्रवाशांना करावा लागला आहे.