मंचर: सुमारे पाच महिन्यांनंतर श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात भाविकांसाठी विनापास दर्शन व्यवस्था गुरुवार (दि. १८) पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार सकाळी ७ ते ११ या वेळेत भाविकांना थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, मंदिर परिसरातील गर्दीत लक्षणीय वाढ झाली आहे.
श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसरात विविध विकासकामे सुरू असल्याने दर्शन व्यवस्थापन आणि सुरक्षा राखणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे. विशेषतः समामंडप उभारणीसाठी बसविण्यात आलेले लोखंडी पाइप, बांधकाम साहित्य आणि मर्यादित जागा यामुळे गर्दीचे नियोजन अधिक काळजीपूर्वक करावे लागत आहे.
विनापास दर्शनाची माहिती मिळताच राज्यासह देशातील विविध भागांतून आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याचे चित्र दिसून येत आहे. स्थानिक ग्रामस्थ, देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासन यांच्या समन्वयातून दर्शन व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेसह वाहतूक, रांगांचे नियोजन आणि मंदिर परिसरातील शिस्त यावर विशेष भर दिला जात आहे.
आगामी शनिवार, रविवार तसेच धार्मिक उत्सवांच्या काळात गर्दी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने अतिरिक्त उपाययोजनांची आवश्यकता व्यक्त होत आहे. भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करून शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षित आणि सुरळीत दर्शन व्यवस्था राखण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा सज्ज असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
भीमाशंकर येथे विनापास दर्शन सुरू झाल्यानंतर भाविकांची संख्या वाढत आहे. कोणतीही गैरसोय अथवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.सागर पवार, सहायक पोलिस निरीक्षक, घोडेगाव पोलिस ठाणे