BJP Pudhari
पुणे

Belsar Group Election Result: बेलसर गटात भाजपचे वर्चस्व; अंतर्गत कलहामुळे राष्ट्रवादीला फटका

पुरंदर विमानतळ परिसरातील निवडणुकीत भाजपची दमदार कामगिरी, स्थानिक राजकारणात मोठा बदल

पुढारी वृत्तसेवा

अमृत भांडवलकर

सासवड: पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरातील बेलसर गटात यंदाच्या निवडणुकीत भाजपने दमदार कामगिरी करीत आपले वर्चस्व ठळकपणे सिद्ध केले आहे. राज्यात महायुती एकत्र असली, तरी स्थानिक पातळीवरील गटबाजी, अंतर्गत मतभेद आणि वर्चस्वाच्या राजकारणाचा थेट परिणाम या निकालात दिसून आला. राष्ट्रवादी काँग््रेासमधील बंडखोरी, पक्षांतर आणि अंतर्गत संघर्षामुळे भाजपला अनपेक्षित संधी मिळाली आणि त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रत्येकी एका जागेवर चुरशीच्या लढतीत विजय मिळवला. शिवसेनेला मात्र एका जागेवर समाधान मानावे लागले.

बेलसर गटात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे विश्वासू मानले जाणारे सुदामराव इंगळे यांच्या परिवारातील उमेदवारीने निवडणुकीची समीकरणेच बदलून टाकली. भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी घेतलेली तटस्थ भूमिका आणि स्थानिक पातळीवरील असंतोष यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. राष्ट्रवादीला सुरुवातीलाच अंतर्गत मतभेदांचा फटका बसला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ताशेठ झुरंगे यांची उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी काँग््रेासमध्ये प्रवेश करून थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.

दुसरीकडे इच्छुक उमेदवार अमोल कामठे यांनाही संधी न मिळाल्याने त्यांनी शिवसेना (उबाठा) पक्षाकडून निवडणूक लढवली. परिणामी, राष्ट्रवादीच्या मतांमध्ये विभागणी झाली आणि अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आला. या सर्व घडामोडींमुळे बेलसरचे राजकारण कमालीचे नाट्यमय बनले होते. जिल्हा परिषद गटात भाजपचे अजय कैलास इंगळे यांनी 7 हजार 597 मते मिळवत विजय संपादन केला. काँग््रेासचे दत्ता झुरुंगे यांना 6 हजार 153 मते मिळाली. इंगळे यांनी 1 हजार 444 मतांची आघाडी घेत जागा कायम राखली.

या गटात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना (उबाठा) आणि काँग््रेास या सर्व प्रमुख पक्षांचे दिग्गज चेहरे मैदानात असल्याने लढत बहुरंगी आणि प्रतिष्ठेची ठरली होती. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले होते. बेलसर पंचायत समिती गणात शिवसेनेचे माणिक बाळासोा निंबाळकर यांनी 4 हजार 783 मते मिळवत राष्ट्रवादी काँग््रेासचे नीलेश कृष्णा जगताप 4 हजार 257 मते यांचा 526 मतांनी पराभव केला. तर, माळशिरस पंचायत समिती गणात भाजपचे माऊली अप्पा यादव यांनी 4 हजार 585 मते मिळवत शिवसेनेचे शरद बाळासाहेब यादव 3 हजार 240 मते यांचा 1 हजार 345 मतांनी पराभव केला.

बेलसर गटात राष्ट्रवादीचे सुदामराव इंगळे, विजय कोलते, माणिक झेंडे पाटील, राजेंद्र भोसले, गणेश होले; शिवसेनेचे धीरज जगताप, संतोष यादव, अनिल भगत, बाळासाहेब कोलते, शिवनाना कामठे; तसेच भाजपचे श्रीकांत राऊत, सुनीता कोलते, विलास खेसे, दीपक यादव यांसारख्या नेत्यांचे मजबूत संघटन कार्यरत आहे. त्यामुळे या गटातील लढत केवळ निवडणूक न राहता प्रतिष्ठेची आणि वर्चस्वाची ठरली. बेलसर गटातील निकालाने स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे आणि अंतर्गत कलह किती निर्णायक ठरू शकतात, हे अधोरेखित केले आहे. भाजपने या परिस्थितीचा अचूक फायदा घेत आपली पकड अधिक मजबूत केली, तर राष्ट्रवादीसमोर संघटनात्मक ऐक्य टिकवण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT