पुणे : बावधन, भुसारी कॉलनी आणि भूगाव परिसरात गेल्या काही दिवसांत अतिसार, पोटदुखी व उलटी अशा तक्रारींमुळे अचानक खूप नागरिक आजारी पडल्याचे पहायला मिळत आहे. पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिसळल्याने रुग्ण वाढल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रुग्णसंख्येचा उद्रेक झाल्याने महापालिकेच्या आरोग्य पथकाने तातडीने मंगळवारी पाहणी केली. पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित भागात सर्वेक्षण सुरू केले असून तातडीच्या वैद्यकीय प्रतिबंधक उपाययोजना राबवल्या जात आहेत. परिसरात मोबाइल क्लिनिक नेमण्यात आले असून नागरिकांना आवश्यक ती औषधे दिली जात आहेत. ‘मेडिक्लोर-एम’ या गोळ्यांचे वाटप करून पाणी निर्जंतुकीकरण करण्याचे आवाहन केले आहे.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
> किमान 20 मिनिटे पाणी उकळून थंड झाल्यावरच प्यावे.
> लक्षणे आढळताच जवळच्या आरोग्य केंद्रास भेट द्यावी.
दरम्यान, परिसरातील खासगी दवाखाने व महापालिकेच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) रुग्णांची गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे. बावधन परिसर नव्याने समाविष्ट झालेल्या भागांपैकी एक असल्याने पाणीपुरवठ्याची यंत्रणा पूर्णपणे सुधारलेली नाही. त्यातूनच दूषित पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अधिक तपास सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणे महानगरपालिकेच्या समाविष्ट गाव बावधन बुद्रुक येथील गुंडेवस्ती, पाटीलनगर जाधववस्ती, गावठाण या भागामध्ये पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब अशा आजारांचे रुग्ण तीन दिवसांपासून आढळून आले आहेत. या भागात आरोग्य पथकांतर्फे सर्वेक्षण सुरू आहे.
- डॉ. वैशाली जाधव, सहाय्यक आरोग्य अधिकारी पुणे महापालिका
नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून थंड करून प्यावे. पाण्यामध्ये मेडिक्लोर टाकून निर्जंतुकीकरण करावे. लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या महापालिकेच्या दवाखान्यामध्ये जाऊन उपचार करून घ्यावेत.
- डॉ. अंजली टिळेकर, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी, पुणे महापालिका
बावधन परिसर, उजवी भुसारी कॉलनी व डावी भुसारी कॉलनी, इंदिरा शंकरनगरी, वेदभवन परिसर, सौदामिनी, मोकाटेनगर व इतर परिसरात अनेक नागरिकांमध्ये उलट्या, जुलाब, पोटदुखी या आजारांच्या तक्रारी दिसत आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्वरित वैद्यकीय उपाययोजना करणे आवश्यक आहे.
- प्रशांत कनोजिया, प्रमुख राज्य संघटक, मनविसे
तीन दिवसांपासून जुलाब आणि अतिसाराचा त्रास होत आहे. दूषित पाण्यामुळे हा त्रास झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उजवी भुसारी कॉलनी, डावी भुसारी कॉलनी या आजूबाजूच्या भागातील अनेक लोक आजारी पडले आहेत. या भागातील दवाखान्यांमध्येही सकाळ-संध्याकाळ रुग्णांची संख्या वाढली आहे. महापालिका आरोग्य विभाग आणि पाणीपुरवठा विभागातील लोक मंगळवारी सकाळी पाहणीसाठी आले होते. आम्ही आमच्या समस्या त्यांच्याकडे मांडल्या आहेत. - प्रसाद गोखले, नागरिक
दहा-पंधरा दिवसांपासून अतिसार, जुलाबाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. इतर वेळेपेक्षा रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. लक्षणांच्या तीवतेनुसार औषधोपचार दिले जात आहेत.
- डॉ. विजय तरटे, भारतीनगर, पौड रस्ता