बारामती: शहरातील तांदूळवाडी येथे एका कार्यक्रमादरम्यान जेवण वाढत असताना काढलेले व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याच्या वादावरून 18 वर्षीय तरुणावर झालेल्या हल्लाप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी तातडीची कारवाई करीत दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे.
दि. 18 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता सार्थक लक्ष्मण अंबुरे (वय 18, रा. तांदूळवाडी) हा भैरवनाथ मंदिरात पालखीतील भाविकांसाठी जेवण वाढण्याचे काम करीत होता. या वेळी गावातील एकाने त्याचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. तो डिलीट करण्यावरून वाद झाला. नंतर पप्पू शितोळेने त्याला काम असल्याचे सांगून मंदिराच्या मागील बाजूस नेले. तेथे आधीच गणेश सुभाष जाधव, अभिजित शेळके, अरुण जाधव व अन्य इसम उपस्थित होते. यानंतर सार्थकला शिवीगाळ करून जबरदस्तीने यश शितोळे यांच्या घराकडे नेण्यात आले. तेथे खाली पाडून गज आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या वेळी गणेश जाधव याने गचांडी धरून पिस्तूल काढत जिवे मारण्याची धमकी दिली, तर पप्पू शितोळे याने प्रकार कुणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.
मारहाणीत सार्थकच्या पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे. जिवाच्या भीतीने त्याने तत्काळ तक्रार दिली नव्हती. मात्र, दुसऱ्या दिवशी दुखापतीचा त्रास वाढल्यानंतर त्याने आईसह बारामती तालुका पोलिस ठाण्यात धाव घेतली. गंभीर दुखापत केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तालुका पोलिसांनी तत्काळ पोलिस पथक पाठवून मुख्य आरोपी गणेश सुभाष जाधव (वय 34) व पप्पू शितोळे (वय 34, दोघेही रा. तांदूळवाडी) यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
आरोपींना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावलेली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, तपास बारामती तालुका पोलिस करीत आहेत. गणेश सुभाष जाधव याच्यावर यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या प्रकरणात एका अल्पवयीन मुलालासुद्धा डोक्यात कोयता लागला होता, त्याच्या तक्रारीवरून आरोपी सार्थक अंभोरे, आकाश अंभोरे, बापू अंभोरे, पोपट अंभोरे, लखन अंभोरे यांच्याविरोधातही गंभीर मारहाणीसह शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, अप्पर अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक युवराज पाटील, अंमलदार सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, जितेंद्र शिंदे, मनोज पवार, दादा खराडे, आफिन शेख आदींनी केली.