बारामती: बारामती तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीवता प्रचंड वाढल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. चार दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावूनही उकाड्यात कोणतीही घट झालेली नसून, सकाळपासूनच अंगाची लाही-लाही होत आहे. वाढत्या तापमानामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच शेतकरी सर्वाधिक त्रस्त झाला आहे.
मे महिन्यातील कडक उन्हामुळे बारामतीचा बागायती पट्टा होरपळून निघत असून, यंदा अनेक वर्षांतील उच्चांकी तापमानाची नोंद तालुक्यात झाली. सकाळची सुरुवातच घामाच्या धारांनी होत आहे. दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत आहेत.
सकाळी दहानंतर बाजारपेठा आणि मुख्य रस्त्यांवरील वर्दळ कमी होत असून, नागरिक अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत. उष्णतेचा परिणाम शेती क्षेत्रावर देखील जाणवत आहे. तरकारी पिके कोमेजू लागली असून, विहिरी, कूपनलिका आणि तलावांच्या पाणीपातळीत प्रचंड घट झाली आहे.
शेतकरी सकाळच्या वातावरणातच शेतीची कामे उरकून घेत आहेत. जनावरांनाही उन्हाचा फटका बसत असल्याने अनेक जनावरे आजारी पडत आहेत. अवकाळी पावसानंतर वातावरणात काहीसा गारवा निर्माण होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती; मात्र पावसानंतर पुन्हा वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
सध्या सकाळी दहापासूनच उन्हाचा प्रचंड चटका लागत आहे. तो सायंकाळी सहापर्यंत कायम राहत आहे. परिणामी घराबाहेर पडणे सुद्धा मुश्कील झाले आहे. दुचाकीवरून प्रवास करताना अंग भाजून निघाल्यासारखे होत आहे. सध्याचे वातावरण बघता पुढील काही दिवस तरी उन्हाचा तडाखा कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.