बारामती: बारावीनंतरचा टप्पा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असतो. करिअर निवडताना विचारपूर्वक निर्णय घेणे आवश्यक असते. त्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी. करिअरच्या शेकडो संधी आहेत, फक्त गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि विशेषतः पालकांनी गोंधळून न जाता करिअरचा मार्ग निवडावा, असे आवाहन 'पुढारी' माध्यम समूहातर्फे बारामतीत आयोजित 'पुढारी कॅम्पस टू करिअर' उपक्रमात तज्ज्ञ मान्यवरांनी केले.
बारामतीत भिकोबा तांबे सभागृहात रविवारी (दि. २१) हा कार्यक्रम पार पडला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचीही या वेळी लक्षणीय उपस्थिती होती. बारावीनंतर पुढे काय? याचे असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेले असतात. ते सर्व प्रश्न सुटण्यासाठी 'पुढारी' माध्यम समूहाने व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. विद्यार्थी-पालकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. शिवाय या कार्यक्रमात योग्य मार्गदर्शन मिळाल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. तज्ज्ञ मान्यवरांचे स्वागत 'पुढारी' माध्यम समूहातर्फे करण्यात आले. बारावीतील गुणवंतांचा या वेळी सत्कार करण्यात आला. विश्वकर्मा विद्यापीठाचे प्रा. डाॅ. युवराज लाहोटी यांच्यासह अन्य मान्यवर या वेळी उपस्थित होते.
प्रा. डाॅ. मकरंद पुरी, विश्वकर्मा विद्यापीठ, पुणे
विज्ञान, कला व वाणिज्य शाखेतून बारावी झाल्यानंतर काय करायचे, हा मोठा प्रश्न आहे. मेडिकल की इंजिनिअरिंग याचा निर्णय अगोदरच झालेला असतो. बारामती हा कृषिप्रधान भाग आहे. औद्योगिक क्षेत्र मोठे आहे. कुशल मनुष्यबळाची मोठी गरज येथे आहे. डेटा ॲनॅलिसिस, एआय, सीए यांसह अन्य क्षेत्रांत मास्टर्सची गरज आहे. हे सगळे पुण्यात उपलब्ध आहे. एखाद्या क्षेत्रात आपण का जायचे, हे समजले पाहिजे. केवळ इमारत बघून महाविद्यालयाची निवड करू नका. मार्केटमध्ये जी गरज आहे त्याचेच शिक्षण घेणे आता काळाची गरज आहे. प्रत्येक विद्यापीठ शिष्यवृत्ती देत आहे, त्याचाही फायदा घ्यावा. विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना स्वतःची आवडसुद्धा लक्षात घ्यावी. चांगले काॅलेज तर आवश्यक आहेच, पण चांगले कोर्सेसही तेवढेच गरजेचे आहेत.
प्रा. डाॅ. रामदास बिरादार, पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटी
प्रत्येक वेळी आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रवेश मिळेलच असे नाही. २८ वर्षांत इंजिनिअरिंग व मेडिकल क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. सर्वसाधारण व ओबीसी प्रवर्गासाठी जास्त मेरिट नसते. प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी सर्व लेक्चर्सला उपस्थित राहणे गरजेचे आहे. ज्याची आर्थिक परिस्थिती जशी आहे त्यांनी त्या पद्धतीने विचार करत शिक्षणाचा निर्णय घ्यावा. खासगी काॅलेज की सरकारी हा प्रश्न पालकांसमोर कायम असतो. एमआयटी, व्हीआयटी, डी. वाय. पाटील या सारख्या नामांकित महाविद्यालयात शिष्यवृत्ती दिली जाते. उच्च शिक्षण घेताना आई-वडील, शिक्षक, मित्र आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. असा चांगला सल्ला भविष्यात फायदेशीर ठरतो. चार वर्षे अतिशय तळमळीने शिक्षण घेतले, तर पुढील ४० वर्षे अतिशय सुखात जातील. त्यासाठी करिअर निवडताना अत्यंत काळजीपूर्वक निवडा.
प्रा. मुकेश अग्रवाल, डी. वाय. पाटील विद्यापीठ
इंजिनिअरिंगमध्ये करिअर आहे; मात्र त्यात बदल हवा आहे. सन २००० मध्ये मोबाईल नव्हते, पेजर होते. पेजरमध्ये मेसेज जायचे. आता मोबाईलने क्रांती केली आहे. आपली पदवी व नोकरी कायमस्वरूपी टिकली पाहिजे, यासाठी काळानुरूप शिक्षण घ्यावे लागेल. आत्तापासूनच एक लाख पगाराच्या नोकरीची अपेक्षा ठेवा. कोणत्याही क्षेत्रात तुमची आवड महत्त्वाची आहे. फाॅरेन्सिक सायन्समध्ये भविष्यात चांगल्या नोकऱ्या आहेत. फाॅरेन्सिक रिपोर्ट गुन्हेगारांच्या शिक्षेसाठी न्यायालयात महत्त्वाचे ठरत आहेत. या क्षेत्राचाही विद्यार्थ्यांनी विचार करावा. इंजिनिअरिंग काॅलेज निवडताना ऑप्शन फाॅर्म व कटऑफबाबतची सर्व तांत्रिक माहिती घ्यावी. डोळसपणे प्रवेशप्रक्रियेत सहभागी व्हावे. आजच्या काळात पारंपरिक करिअरपेक्षा अनेक वेगळ्या संधी उपलब्ध आहेत. प्रत्येकाला मोठे पॅकेज हवे असतेर; पण ते मिळाल्यानंतर सुयोग्य नियोजनाचीही गरज असते. वेल्थ मॅनेजमेंटला आता महत्त्व आले आहे. वेल्थ मॅनेजमेंट एक्स्पर्टची आवश्यकता आहे. त्यामुळे या पर्यायाचाही विचार व्हावा. आता करिअरचे स्वरूप इंटर डिसिप्लिनरी व मल्टी डिसिप्लिनरी झाले आहे. त्यामुळे फक्त नोकरी मिळविण्याचा दृष्टिकोन न ठेवता समस्यांचाही अभ्यास करावा. समस्या खूप आहेत, त्यावर उपाय शोधण्याचे कौशल्य असणे गरजेचे आहे.
प्रा. राज जाधव, डिजिटल रोबोटिक्स
एआय क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी आहेत. त्यासाठी आम्ही कम्युनिकेशन स्कील, बेसिक स्किल यावर काम करतो. स्किल ट्रेनिंग प्रोग्राम, उद्योजकता ट्रेनिंगसाठी, एआय रोबोटीक्ससाठी आम्ही काम करतो. पुढील २५ वर्षांत हे क्षेत्र अग्रेसर राहणार आहे. या क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांनी रिच माईंडसेट ठेवला पाहिजे. वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. चांगल्या गोष्टींना वेळ दिला पाहिजे.
डाॅ. प्रा. शेखर राहाणे, पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटी
जेईई, आयआयटी आदींसाठी प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी अर्ज व्यवस्थित भरावा. ऑनलाईन-ऑफलाईन चेक करावा. व्हेरिफिकेशन करून त्याची प्रिंट काढावी. ५० ते १०० टक्के स्काॅलरशीपची सोय राज्य सरकारने केली आहे. विविध जातीतील विद्यार्थ्यांसाठी जातीचा दाखला, नाॅन क्रिमिलेअर अशी दहा प्रकारची कागदपत्रे प्रवेशासाठी लागत आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी राज्य सरकार विविध योजना राबवत आहे. तुम्हाला ज्या क्षेत्रात शिक्षण घ्यायचे आहे, काम करायचे आहे, त्याची यादी तयार करा. मी हे करू शकतो, असा आत्मविश्वास ठेवा. करिअरसाठी खूप क्षेत्र आहेत. पण, स्वतःची आवड लक्षात घ्या. भविष्याचा वेध घ्या. भविष्यात कोणत्या क्षेत्रातील संधी टिकून राहतील, याचा पालकांनी व विद्यार्थ्यांनी विचार करावा आणि त्या पद्धतीने करिअर निवडावे. करिअरच्या शेकडो संधी उपलब्ध आहेत. अनेक नवनवीन कोर्सेस सुरू झाले आहेत. रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. फक्त आपल्याकडे कौशल्य असणे गरजेचे आहे.
डाॅ. शंतनू देशपांडे, कॅम्पस देखो टाॅट एआय
कोणत्याही ठिकाणी प्रवेश घेताना करिअरच घडवायचे असेल, तर किमान १५० हून अधिक शाखांचा विचार केला पाहिजे. यामध्ये तुम्हाला हवे ते मिळून जाईल. पालक व विद्यार्थ्यांनी संयम बाळगल्यास चांगल्या करिअरच्या संधी सहज हाती सापडू शकतात. १५ वर्षांपूर्वी काय होते, याचा विचार करण्यापेक्षा २०४० मध्ये कोणती क्षेत्रं असतील, यातच करिअरच्या अनेक संधी दडलेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी संगणक आल्यावर नोकऱ्या जातील, अशी भीती व्यक्त होत होती. परंतु रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या. आता कृत्रिम बुद्धीमत्तेचा शिक्षण क्षेत्रात मोठा वापर सुरू झाला आहे. प्रत्येकाने त्याचे ज्ञान आत्मसात केले, तरच स्पर्धेत टिकता येईल. मार्केटिंग क्षेत्रात चांगले करिअर असून इंडस्ट्रीच्या ज्ञानाबरोबरच नवनवीन कौशल्ये महत्त्वाची आहेत. आरोग्य क्षेत्रातही मोठ्या संधी उपलब्ध आहेत. रोबोटिक, रिमोट कंट्रोल ऑपरेटींग यामध्ये करिअरच्या संधी आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी बेस समजून घ्यावा. चांगला मार्गदर्शक तुम्हाला नेहमीच यशाच्या शिखरावर पोहोचवतो.