राजेंद्र गलांडे
बारामती: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर झालेली पोटनिवडणूक दुःखद आणि भावनिक वातावरणात पार पडली. या निवडणुकीत मताधिक्याचा देशात नवा विक्रम प्रस्थापित करण्याची संधी बारामतीकरांना होती. परंतु, दादांची छत्रछाया हरपल्यावर उलट बारामतीचा मतदानाचा टक्का घसरला. राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी, नेतेमंडळींची निष्क्रियता आड आली. शहरासह गावोगावी असलेली गटबाजीसुद्धा याला कारणीभूत ठरली.
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्याविरोधात अपक्ष २२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. तुल्यबळ उमेदवार समोर नव्हता. परिणामी, या निवडणुकीत मतांचा मोठा विक्रम प्रस्थापित करण्याची मोठी संधी होती. परंतु, ती काहीअंशी गमावल्याचेच अंतिम आकडेवारीवरून दिसून आले. बारामती तालुक्यात या वेळी ३ लाख ८४ हजार ५७९ मतदार होते. त्यापैकी २ लाख २३ हजार ७०५ मतदारांनी मतदान केले. मतांची ही टक्केवारी ५८.१७ इतकी आहे. गत निवडणुकीत २ लाख ७१ हजार २६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. त्यात अजितदादा पवार यांना १ लाख ८१ हजार १३२, तर युगेंद्र पवार यांना ८० हजार २३३ मते मिळाली होती.
पोटनिवडणुकीमुळे मतदारांची असलेली उदासीनता, उन्हाचा कहर, स्थानिक नेतेमंडळींकडून अपेक्षित न मिळालेली साथ, यामुळे टक्केवारी ६० च्या वर गेली नाही. खा. पार्थ पवार यांनी २ लाख १७ हजारांचे मताधिक्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. २ लाख २३ हजारांपैकी अन्य २२ उमेदवार व नोटा किती मते घेतो? यावर आता सुनेत्रा पवार यांचे मताधिक्य अवलंबून असेल. परंतु, तरीही २ लाख १५ हजारांहून अधिकचे मताधिक्य त्यांना मिळेल, असा अंदाज आहे.
वर्षानुवर्षे बारामतीच्या राजकारणावर दादांचे वर्चस्व आणि एकहाती अंमल होता. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांमध्ये एकसंधता आणि शिस्त दिसून येत होती. बूथनिहाय आकडेवारी काढत ते पदाधिकारी-कार्य़कर्त्यांची हजेरी घेत होते. त्यामुळे स्थानिक नेतेमंडळींना 'काम' दाखविण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यांच्या पश्चात ही पकड काहीअंशी ढिली झाली आहे. काही पदाधिकारी, कार्यकर्ते निष्क्रिय झाले आहेत. शहरासह गावोगावी पक्षात दोन गट आहेत. त्याचा फटका बसल्याचे दिसून आले.
कागदावर मोठे काम पदाधिकाऱ्यांनी दाखविले. प्रत्यक्षात मतदारांना केंद्रापर्यंत नेण्यात ते कमी पडले. मतदारांमध्ये निर्माण झालेली उदासीनता मतांच्या टक्केवारीत स्पष्टपणे दिसून आली. नगरपरिषद अथवा ग्रामपंचायत निवडणुकीत झाडून काम करणारे पदाधिकारी या निवडणुकीत तेवढी चुणूक दाखवू शकले नाहीत. शहरात काही नगरसेवकांनी केवळ दिखावा केला. दादांच्या जिवावर जे मोठे झाले त्यांनी अंग काढून घेतल्याचे दिसून आले, तर काहींनी प्रामाणिक काम केले. दादांच्या प्रेमाखातर सामान्य कार्यकर्त्याने मात्र जिवाचे रान केले.
मतांची आकडेवारी ही घसरण केवळ आकड्यांची नाही, तर संघटनात्मक कमकुवतपणाचा इशारा आहे. २०२९ चा उमेदवार कोण? यावरून पवार कुटुंबात आत्ताच सुंदोपसुंदी सुरू झाली आहे. ही परिस्थिती सुधारली नाही, तर भविष्यात बारामतीच्या राजकारणावर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. 'बालेकिल्ला' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारामतीवरील पकड अधिक घट्ट करण्यासाठी नेतेमंडळींनाही यापुढे सजग राहावे लागणार आहे.