गणेश खळदकर
पुणे: विद्यार्थ्यांना भूतकाळ समजावून सांगत वर्तमानाचा विचार करण्याची क्षमता विकसित करायची आणि लोकशाही मूल्ये, संविधानाचा आदर, सामाजिक बांधिलकी व जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण करायची. यातूनच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया मजबूत करायचा, या उद्देशानेच सहावीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाच्या पुस्तकाची निर्मिती बालभारतीने केल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्या माध्यमातून यंदा हीरक महोत्सवी वर्षानिमित्त दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकांची भेट देण्यात आली आहे. सहावीच्या इतिहास व नागरिकशास्त्र या पुस्तकात इतिहासाच्या १० आणि नागरिकशास्त्राच्या सहा अशा एकूण १६ प्रकरणांचा समावेश केला आहे.
'इतिहासाची साधने' या प्रकरणाने या पुस्तकाची सुरुवात झाली आहे. यामध्ये मौखिक साधने, वस्तुसंग्रहालये, वारसास्थळे आदींची माहिती दिली आहे. 'प्रागैतिहासिक काळ' या पाठाच्या माध्यमातून मध्याश्मयुग ते नवाश्मयुग, ताम्रपाषाणयुग, राज्यातील उत्खननस्थळांची माहिती दिली आहे. 'हडप्पा संस्कृती' या पाठातून जगातील प्राचीन नागरी संस्कृतींपैकी एक असलेल्या हडप्पा संस्कृतीचा परिचय करून दिला आहे. 'वैदिक संस्कृती' या पाठात वैदिक काळातील समाजजीवन, शिक्षण, धर्म, व्यवसाय, भाषा आणि परंपरांबद्दल माहिती आहे. 'विविध धर्मांची शिकवण' या पाठात वैदिक, जैन, बौद्ध, ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम, पारशी आदी धर्मांची माहिती आहे. 'जनपदे आणि महाजनपदे' या पाठात प्राचीन भारतातील राज्यांची निर्मिती, प्रशासन आणि विस्तार यांची माहिती दिली आहे. 'मौर्यकालीन भारत' या पाठात मौर्य साम्राज्याची स्थापना, सम्राट अशोक आणि त्या काळातील प्रशासनव्यवस्थेची माहिती आहे. 'प्राचीन भारतातील व महाराष्ट्रातील राज्ये व राजघराणी' या पाठात शुंग घराणे, कण्व घराणे, इंडो ग्रीक राज्यकर्ते, शक राज्यकर्ते, सातवाहन घराणे, कुशाण राज्यकर्ते, गुप्त घराणे, वर्धन घराणे आदींची माहिती देण्यात आली आहे. 'प्राचीन भारताचा सांस्कृतिक वारसा' या पाठाच्या माध्यमातून प्राचीन भारतातील सांस्कृतिक जीवन, व्यापार, व्यवसाय आणि आर्थिक जीवन, वैद्यकशास्त्र, शिक्षण पद्धतीसह महाराष्ट्राची संमिश्र संस्कृती याची माहिती दिली आहे. 'प्राचीन भारत व जग' या पाठात पर्शियन संस्कृती, ग्रीक रोमन संस्कृतीचा भारतावरील परिणाम, भारत आणि शेजारील देश, यांविषयी माहिती आहे.
नागरिकशास्त्राची सुरुवात 'आपले समाजजीवन' या पाठाने झाली आहे. या पाठात 'समाज' या शब्दाचा नेमका अर्थ, सामाजिक संस्था व त्यांचे कार्य, सामाजिक आणि सांस्कृतिक विविधता, याविषयी माहिती देण्यात आली आहे. 'भारतीय संविधान' या पाठात संविधानाचा अर्थ, त्याची गरज आणि महत्त्व स्पष्ट करून संविधाननिर्मितीची प्रक्रिया आणि संविधान सभेचे कामकाज, याविषयी माहिती दिली आहे.
'भारतीय संविधानाची प्रास्ताविका व वैशिष्ट्ये' या पाठात प्रास्ताविका, भारतीय संविधानाची उद्दिष्टे आणि वैशिष्टे व भारतीय संविधानाप्रमाणे राज्याचे स्वरूप स्पष्ट केले आहे. 'स्थानिक स्वराज्य संस्था' या पाठात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि महापालिका यांची कार्यपद्धती समजावून सांगितली आहे. 'स्थानिक शासनसंस्था' या पाठात नगरपंचायत, नगरपरिषद, महापालिका, कटक मंडळ आदींविषयी माहिती देण्यात आली आहे. तर 'जिल्हा प्रशासन' या शेवटच्या पाठात जिल्हा प्रशासनाची ओळख, महसूल, पोलिस, न्याय प्रशासन आदी संस्थांच्या प्रशासनाची रचना, कार्य, अधिकार यांविषयी माहिती देण्यात आली आहे.
नागरिकशास्त्राला तुलनेने महत्त्व कमी
'इतिहास व नागरिकशास्त्र' या पुस्तकात नागरिकशास्त्र हे सहाच प्रकरणात संपवले आहे. यामध्ये नागरिकांना मतदानाचा हक्क कधी मिळतो, त्यांना कोणकोणते अधिकार आहेत, त्यांना कोणती कर्तव्ये बजावणे गरजेचे असते, याविषयी अत्यंत त्रोटक माहिती देण्यात आली आहे. तसेच, एकूण पुस्तकातच नागरिकशास्त्राला तुलनेने कमी महत्त्व दिले असल्याची माहिती पुस्तकपरीक्षणासाठी दिलेल्या तज्ज्ञांनी दिली आहे.