शेतकर्‍यांच्या विद्युत मोटारी चोरीला Pudhari File Photo
पुणे

तब्बल 50 शेतकर्‍यांचे विद्युत पंप चोरीला

निमगाव केतकी परिसरातील शेतकर्‍यांंना बसला आर्थिक फटका

पुढारी वृत्तसेवा

इंदापूर : निमगाव केतकी परिसरातील सुमारे 50 शेतकर्‍यांच्या विहिरीवरील विद्युत पंपाच्या तांबे असलेल्या सबमर्सिबल केबल या आठ दिवसांमध्ये चोरीला गेल्या आहेत. मागील तीन वर्षांपासून सातत्याने केबलची चोरी होत असल्याने शेतकर्‍यांमधून संतापाची लाट निर्माण झाली आहे. तक्रारीची कोण दखलच घेत नसेल तर शेतकर्‍यांवरील अन्यायाला कोणी वाली आहे का नाही? असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.

शुक्रवारी (दि. 18) रात्री निमगाव केतकी हद्दीतील निरा डावा कालव्याशेजारील सुमारे 20 शेतकर्‍यांच्या विहिरीवरील सबमर्सिबल केबल चोरीला गेल्या. यामध्ये प्रत्येक शेतकर्‍याला दोन ते पाच हजार रुपयांचा भुर्दंड बसला. यापेक्षाही पुन्हा केबल जोडण्यासाठी विद्युत पंप विहिरीवर उचलून जोडण्यासाठी ट्रॅक्टर व मनुष्यबळ याचा होणारा खर्च व मनस्ताप फार मोठा असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. याबाबत निमगाव केतकी येथील शेतकरी हर्षवर्धन श्रीपती पाटील म्हणाले की, 18 एप्रिल रोजी घाडगे लवणातील 20 पेक्षा जास्त शेतकर्‍यांच्या केबल चोरीला गेल्या. दोन वर्षांत तिसर्‍यांदा माझी केबल चोरीला गेली आहे.

एका वेळेस तीन हजार रुपयांचा फटका बसतो. त्यापेक्षाही पुन्हा केबल जोडण्यासाठी ट्रॅक्टर व मनुष्यबळ जास्त लागते. त्याचा खर्च केबलपेक्षा जास्त येतो आणि मनस्ताप खूपच होतो. मागील वर्षी आम्ही पोलिसांत तक्रार दिली होती; मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. याची कोण दखल घेणार नसेल तर आम्ही किती दिवस हा त्रास सहन करायचा? परिसरातील दोन-तीन तालुक्यांतील स्क्रॅप घेणार्‍या दुकानदारांना तंबी दिली, तरी अशा चोर्‍या होणार नसल्याचे ते म्हणाले. निमगाव केतकी येथील जगन्नाथ भोंग म्हणाले की, मागील वर्षी माझी केबल गेल्यानंतर पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर विहिरीजवळ कॅमेरे बसविले. 18 एप्रिल रोजी चोर केबल नेण्यासाठी आल्यानंतर सायरन वाजल्यानंतर तिथून पळाले. मात्र, परिसरातील सर्व शेतकर्‍यांच्या केबल त्यांनी चोरून नेल्या.

दरम्यान, मंगळवारी (दि. 22) निमगाव केतकी व वरकुटे खुर्द येथील मानेवस्ती, शेंडेमळा, मुलाणीवस्ती, हेमाडेमळा येथील सुमारे 25 शेतकर्‍यांच्या केबल चोरीला गेल्याचे शेतकरी सांगत आहेत. प्रमोद हेमाडे म्हणाले की, रात्री तीन हजार रुपयांची केबल चोरीला गेली. आज पुन्हा तेवढ्याच किमतीची टाकावी लागली. यापेक्षाही पुन्हा केबल जोडणीचा मनस्ताप फार मोठा आहे. चोरांचा बंदोबस्त झाला पाहिजे.निमगाव केतकी येथील दादाराम बबन माने म्हणाले की, मागील आठवड्यात तीन हजार रुपयांची केबल टाकली होती. रात्री ती चोरीला गेली. सध्या शेतकरी हातबल आहे. चोरांचा तातडीने बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT