पारगाव : आंबेगाव तालुक्यातील वळती, नागापूर, जवळे, थोरांदळे, खडकी आदी गावांच्या वनहद्दीत सध्या गिरिपुष्प (ग्लिरिसिडिया सेपियमची झाडे जांभळट- पांढऱ्या शुभ फुलांनी बहरली आहेत. घनदाट वनक्षेत्रात उभ्या असलेल्या या झाडांवर फुलांचा बहर आल्याने संपूर्ण परिसर निसर्गरम्य दिसत असून, नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
गिरिपुष्पाच्या झाडांवर उमललेली पांढरी शुभ फुले आकर्षक दिसत असून, त्यांचा दरवळ दूरवर पसरतो. विशेष म्हणजे, या फुलांच्या वासामुळे उंदीर पळून जातात, अशी स्थानिकांमध्ये प्रचलित माहिती आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये या झाडांचे विशेष महत्त्व मानले जाते.
वनहद्दीत मोठ्या प्रमाणावर आढळणारी गिरिपुष्प ही झाडे पर्यावरणाच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरत आहेत. फुलोऱ्याच्या काळात परिसरात येणारे पक्षी, फुलपाखरे आणि कीटकांची संख्या वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे जैवविविधतेला चालना मिळत असून, निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होत आहे.
सध्या उन्हाळ्याची चाहूल लागलेली असताना या शुभ फुलांनी सजलेली गिरिपुष्पाची झाडे वन परिसराला वेगळेच सौंदर्य बहाल करीत आहेत. वळती, नागापूर, थोरांदळे या परिसरातून जाणाऱ्या नागरिकांना हा फुलोरा पाहण्यासाठी थांबावेसे वाटत असून, निसर्गप्रेमींना हा देखावा विशेष आकर्षण ठरत आहे.