पारगाव: आंबेगाव तालुक्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून, या रणरणत्या उन्हात देखील शेतातील कामे मात्र थांबलेली नाहीत. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत शेतात राबणाऱ्या शेतमजूर महिलांचे मोठे हाल होत आहेत. एका बाजूला निसर्गाचा रुद्रावतार, तर दुसऱ्या बाजूला वाढती महागाई, यामुळे या महिलांचे जीवन अधिकच कठीण बनले आहे.
सध्या स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर मिळत नाही. चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, खतांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दैनंदिन गरजांच्या वस्तू महाग झाल्याने मिळणाऱ्या मजुरीत घरखर्च भागविणे अवघड झाल्याची खंत शेतमजूर महिलांनी व्यक्त केली. दिवसभर उन्हात कष्ट करूनही केवळ 300 रुपयांची मजुरी मिळत असल्याने संसाराचा गाडा हाकताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
यंदाचा उन्हाळा आत्तापर्यंतच्या सर्वाधिक तीव उन्हाळ्यांपैकी एक असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. दुपारच्या कडक उन्हात अंगाची लाहीलाही होत असताना देखील पोटासाठी शेतात उतरावे लागत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी महिला डोक्यावर छत्र्या, स्कार्फ, टोपी तसेच पूर्ण अंग झाकणारे कपडे वापरताना दिसत आहेत. तरीही उष्माघाताचा धोका कायम असल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
आंबेगाव तालुक्यात एका महिलेचा उष्माघाताने बळी गेल्याची घटना देखील नुकतीच आमोंडी गावात घडली आहे. तालुक्याच्या अनेक भागांत बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतात काम करताना महिलांना सतत धास्ती वाटत आहे. विशेषतः ऊस, मका आणि दाट पिकांच्या शेतात काम करताना जीव मुठीत धरून काम करावे लागत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा काम करताना बिबट्यांच्या हालचालींची भीती अधिक जाणवत असल्याचेही महिलांनी सांगितले.
विशेष सुविधा देण्याची मागणी
महागाई, कमी मजुरी, वाढते तापमान आणि वन्यप्राण्यांची भीती, या चौफेर संकटात शेतमजूर महिला सापडल्या असून, शासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. शेतमजूर महिलांसाठी विशेष आरोग्य सुविधा, उन्हाळी संरक्षण साहित्य, वाढीव मजुरी तसेच अत्यावश्यक वस्तूंवरील दरनियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी महिलांकडून करण्यात येत आहे