पुणे : व्यसनाधीनता ही फार मोठी समस्या आहे. यामुळे समाजासमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. व्यसनी व्यक्तीचा सांभाळ करणे, ही केवळ त्या कुटुंबाची जबाबदारी नसते, तर ती सामाजिक जबाबदारीदेखील आहे. व्यसनमुक्ती हा सामाजिक न्यायाचा भाग आहे. या समस्येबाबत अधिक व्यापक दृष्टिकोन बाळगणे आवश्यक आहे. व्यसनाधीनता हे सामाजिक आव्हान बनले असून, यावर वैचारिक मंथन करून मार्ग काढणे आवश्यक आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांनी रविवारी (दि. 8) व्यक्त केले.
पर्यावरण संवर्धनासाठी आणि व्यसनमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कामाची दखल समाजाने घेतली पाहिजे, त्यांचे परिश्रम ओळखले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केंद्राच्या संस्थापक डॉ. अनिता अवचट यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा डॉ. अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार अर्णव महर्षी यांना, तर डॉ. अनिल अवचट स्मृती सृजन सन्मान पुरस्कार प्राची गुर्जर यांच्या यशोवाणी गटास अभय ओक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. नवी पेठेतील निवारा
वृद्धाश्रमाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. आनंद नाडकर्णी उपस्थित होते. या वेळी यशोदा वाकणकर यांनी पुरस्कारार्थींशी संवाद साधला. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. नाडकर्णी म्हणाले, दोन्ही पुरस्कारार्थींनी विकसित केलेले तंत्रज्ञान हे आस्थेवर आधारित आहे. आस्थेवर आधारित तंत्रज्ञानाचा कधीही गैरफायदा घेतला जात नाही. चांगुलपणाची चळवळ आणि हे काम समाजापुढे नेण्याची गरज आहे. पुरस्काराला उत्तर देताना अर्णव महर्षी म्हणाले, की मी अपघातातून वाचलो. पण, माझी अवस्था अत्यंत गंभीर होती. अपघातानंतर माझे संपूर्ण आयुष्य जणू पुन्हा शून्यापासून सुरू झाले होते. अपघातामुळे मी मानसिकदृष्ट्याही पूर्णपणे कोलमडून पडलो.
मनात सतत नकारात्मक विचार येऊ लागले. परंतु, माझ्या कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे, तसेच फिजिओथेरपी, समुपदेशन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर मी बरा झालो. हा प्रवास वेदनादायी असला, तरी संयम, कुटुंबाचा आधार आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर मी स्वतःला पुन्हा उभे केले. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मी अशी साधने विकसित केली की ज्यामुळे ज्यांना शारीरिक मर्यादा आहेत ते आत्मविश्वासाने समाजात वावरू शकतील, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सोनाली काळे यांनी केले.
अमली पदार्थाच्या विक्रीमागे एक समांतर आणि अत्यंत भयावह अर्थव्यवस्था उभी आहे. काही लोक अमली पदार्थांचे सेवन करतात म्हणून ही अर्थव्यवस्था चालते, असे दिसते. मात्र, तिची पाळेमुळे शस्त्रास्त्रांची तस्करी, देशविघातक कृत्य आणि गंभीर गुन्हेगारीपर्यंत पोहचलेली आहेत. अनेकदा अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या साखळीतील कमजोर कडी कायद्याच्या कचाट्यात सापडते. मात्र, मुख्य सूत्रधार कोणी दुसराच असतो, असे अभय ओक यांनी सांगितले.