Chakan MIDC Pudhari
पुणे

Chakan MIDC: चाकण MIDCला मोठा धक्का! 20 कंपन्या गाशा गुंडाळणार? 1,000 कोटींची उलाढाल आणि 4 हजार नोकऱ्या धोक्यात, कारण काय?

Chakan MIDC: चाकण MIDCमधील खराब रस्ते, प्रचंड वाहतूक कोंडी, अपघात आणि पाणी-वीज यांसारख्या पायाभूत सुविधांच्या समस्यांमुळे सुमारे 20 लघुउद्योग स्थलांतराचा विचार करत असल्याची माहिती आहे.

पुढारी वृत्तसेवा

Chakan MIDC: मर्सिडीज-बेंझ, फोक्सवॅगन, स्कोडा, ह्युंदाई यांसारख्या जागतिक कंपन्यांमुळे औद्योगिक नकाशावर महत्त्वाचे स्थान निर्माण केलेल्या चाकण MIDCसमोर आता गंभीर आव्हान उभे राहिले आहे. खराब रस्ते, खड्डे, प्रचंड वाहतूक कोंडी, अपघात आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे येथील सुमारे 20 लघुउद्योगांनी चाकण MIDCमधून स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

या कंपन्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा MIDCमध्ये स्थलांतरित होण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी संबंधित कंपन्यांनी एक संघटना स्थापन केली असून, खंडाळा MIDCमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत.

जर या 20 कंपन्यांचे स्थलांतर प्रत्यक्षात झाले, तर चाकणच्या औद्योगिक क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. या कंपन्यांची एकत्रित उलाढाल सुमारे 1,000 कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात येत असून, त्यांच्याशी संबंधित सुमारे 4 हजार कर्मचाऱ्यांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा त्रास

चाकण MIDCमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग असल्याने दररोज हजारो कामगार आणि मालवाहतूक करणारी वाहने या परिसरातून ये-जा करतात. मात्र, खराब रस्ते आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे येथे वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे.

रस्त्यांवरील खड्डे, वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक व्यवस्थेतील अडचणींमुळे कामगारांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे कंपन्यांकडून सांगितले जात आहे. त्यातच कर्मचाऱ्यांच्या अपघात होण्याच्या घटनाही या कंपन्यांसाठी चिंतेचा विषय बनल्या आहेत.

पाणी आणि वीजपुरवठ्याच्याही तक्रारी

केवळ रस्ते आणि वाहतूक कोंडीच नव्हे, तर पाणी आणि वीजपुरवठ्यासारख्या मूलभूत पायाभूत सुविधांबाबतही कंपन्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

उद्योग सुरळीतपणे चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा सातत्याने आणि योग्य पद्धतीने उपलब्ध होत नसल्याने उत्पादनावर परिणाम होत असल्याचे संबंधित कंपन्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उद्योग चालवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असलेल्या पर्यायी औद्योगिक क्षेत्राचा विचार करण्याची वेळ आल्याचे कंपन्यांकडून सांगितले जात आहे.

खंडाळा MIDCकडे कंपन्यांचा मोर्चा

चाकणमधील अडचणींच्या पार्श्वभूमीवर या 20 कंपन्यांनी एकत्र येत संघटना स्थापन केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून खंडाळा MIDCमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. म्हणजेच या कंपन्यांचे स्थलांतर अद्याप पूर्ण झालेले नसले, तरी त्यासाठीची प्रक्रिया आणि हालचाली सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

चाकण MIDCसाठी गंभीर इशारा

चाकण MIDC ही महाराष्ट्रातील महत्त्वाच्या औद्योगिक पट्ट्यांपैकी एक मानली जाते. ऑटोमोबाईल आणि ऑटो-कॉम्पोनंट क्षेत्रातील अनेक मोठ्या कंपन्यांमुळे या परिसराला देशभरात ओळख मिळाली आहे.

मोठ्या कंपन्यांच्या आसपास अनेक लघु आणि मध्यम उद्योग उभे राहिले. त्यामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती झाली आणि या संपूर्ण परिसराची अर्थव्यवस्था उद्योगांभोवती विकसित झाली.

मात्र, आता याच औद्योगिक पट्ट्यातील कंपन्या पायाभूत सुविधांच्या समस्यांमुळे स्थलांतराचा विचार करत असतील, तर हा चाकण MIDCसाठी गंभीर इशारा मानला जात आहे.

1,000 कोटींची उलाढाल आणि 4 हजार रोजगारांचा प्रश्न

या 20 कंपन्या जर चाकणमधून बाहेर पडल्या, तर त्याचा परिणाम केवळ त्या कंपन्यांपुरता मर्यादित राहणार नाही. त्यांच्यावर अवलंबून असलेले पुरवठादार, वाहतूकदार, कंत्राटी कामगार, सेवा देणारे छोटे व्यवसाय आणि स्थानिक बाजारपेठ यांच्यावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

सुमारे 1,000 कोटी रुपयांच्या उलाढालीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, जवळपास 4 हजार कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

मात्र, कंपन्यांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरु असल्याने प्रत्यक्षात किती कंपन्या चाकणमधून बाहेर पडतात आणि त्याचा रोजगार व आर्थिक उलाढालीवर किती परिणाम होतो, हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे.

उद्योग वाढतोय, पण सुविधा कुठे?

चाकण MIDCच्या या परिस्थितीमुळे एक महत्त्वाचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. मोठ्या कंपन्या आणून औद्योगिक क्षेत्र विकसित करणे पुरेसे आहे का, की त्याच वेगाने पायाभूत सुविधाही उभारणे गरजेचे आहे?

उद्योग वाढले, गुंतवणूक आली आणि रोजगार निर्माण झाले; मात्र रस्ते, पाणी, वीज आणि वाहतूक व्यवस्था त्या वाढीच्या तुलनेत सक्षम झाली नाही, तर त्याचा फटका उद्योगांनाच बसू शकतो.

आता या कंपन्यांच्या मागण्यांकडे प्रशासन किती गांभीर्याने पाहते, चाकणमधील रस्ते, वाहतूक, पाणी आणि वीजपुरवठ्याच्या समस्या किती वेगाने सोडवल्या जातात आणि या कंपन्यांचे स्थलांतर प्रत्यक्षात थांबते का, याकडे उद्योग क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT