वाडा : मच्छिंद्र अगिवले
आयुष्यभर दगड फोडून घरगुती वस्तू बनविणारे हात हळूहळू बेरोजगारीने थकले असून वाड्यातील कलाकारांची ही शोकांतिका व्यथित करणारी आहे. अतिशय अवघड परिस्थित हे कलाकार आपले जीवन जगत असून दगडी वस्तू घडविणारी ही शेवटची पिढी आहे. वडार समाज अतिशय मेहनती असून वाडा शहरात मोठ्या संख्येने असे अनेक कलाकार मागील दोन दशकांपासून वास्तव्य करतात. महागाई व यंत्रांची घुसखोरी यामुळे अनेक कलाकार डबघाईला गेले असून वाड्यातील काही कलाकारांच्या व्यथा जाणून घेण्याचा हा प्रयत्न केला आहे.
प्रकाश पवार हे शरीराने अपंग असूनही दगडांपासून वस्तू बनविणारे एक खास कलाकार आहेत व वाडा शहरातील सावित्री नगर भागात मागील अनेक वर्षांपासून राहतात. वाड्यातील खदाणींमधून निवडक दगड आणण्याचे व घराजवळ बसून त्यांचे रूपांतर विविध वस्तूंमध्ये करायचे हा त्यांचा व्यवसाय आहे.
जाते, खलबत्ते, पाटे, वरवंटे अशा अनेक दगडी वस्तू बनविण्यात प्रकाश यांचा हातखंडा आहे. यांत्रिक युगात वस्तूंची मागणी घटल्याने सध्या प्रकाश केवळ दगडी उथाळे बनवितात. दिवसाला जेमतेम दोन उथाळे बनवून त्यांना यातून जेमतेम 800 ते 1 हजार रुपये मिळतात.
एप्रिल व मे या दोन महिन्यात घरबांधणीच्या मौसमात उथाळयांना मागणी असते मात्र उरलेले 10 महिने कटलरी, भाजीपाला विकून त्यांना उदरनिर्वाह करावा लागतो. दगडी कामात केवळ गाढवमेहनत आहे असे प्रकाश यांचे म्हणणे असून वडिलोपार्जित प्राप्त काल पुढे चालविण्याच्या हेतूने ते आजही काम करतात.
जवळपास 30 वर्षांपासून दिवसरात्र काम करूनही महागाईच्या या काळात पोटाची खळगी भरण्याइतकी कमाई होत असून कौटुंबिक स्थिरता अजूनही निर्माण होत नाही याची खंत त्यांना आहे. स्थानिक कलाकारांनी बनविलेल्या वस्तूंना आपण फारशी किंमत देत नाही. मात्र त्यामागे असणारी मेहनत पाहता अशा कलाकारांना आपण प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.