Wada Mukhyamantri Gramsadak Yojana Pudhari
पालघर

Wada Mukhyamantri Gramsadak Yojana: वाड्यात तयार रस्त्यांवर पुन्हा रस्ते; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेवर प्रश्नचिन्ह

गरज असलेल्या मार्गांकडे दुर्लक्ष, सुस्थितीत असलेल्या रस्त्यांवर कोट्यवधींचा खर्च; स्थानिकांचा संताप

पुढारी वृत्तसेवा

वाडा : वाडा तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांचे उत्तम प्रकारे जाळे विणून मुख्य रस्त्यांशी जनतेला जोडण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते निर्मितीचे भरीव काम केले जात आहे. वाडा तालुक्यात याच योजनेतून अनेक रस्ते बनवून झाले असून अनेकांची कामे सुरू आहेत. निधी खर्चूनही दुर्दैवाने वाडा तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची अवस्था अतिशय भयावह असून कित्येक रस्ते तांत्रिक कचाट्यात सापडलेले आहेत. मांगरुळ ते गारगाव या रस्त्यावर जवळपास अडीच किमी अंतराचे काम नुकताच पूर्ण झाले असून पुन्हा याच मार्गावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ता बनविला जात असल्याच्या संशयाने लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मांगरुळ हे काहीसा दुर्गम पट्ट्यातील गाव मात्र महत्वाचा गाव असून मोठी लोकवस्ती येथे आहे. खराब रस्त्यामुळे हा गाव विकासापासून अधिकच दूर होत असताना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या गावाला रस्ता मंजूर झाला आहे. सुतकपाडा ते गारगाव व गारगाव ते मांगरुळ या रस्त्याचे काम सध्या अज्ञात कंत्राटदाराकडून सुरू असून सुरुवातीला लावलेल्या फलकावर कोणताही मजकूर न लिहिल्याने रस्त्याचे अंतर, एकूण निधी, काम सुरू करण्याची तारीख, मुदत व अन्य माहिती मिळू शकलेली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे बोंड्याचापाडा भागात लाखों रुपये खर्चून जवळपास दोन ते अडीच किमी अंतर मागील दोन वर्षात उत्तम पद्धतीने डांबरीकरण करण्यात आले आहे.

पुन्हा याच मार्गावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांची उभारणी केली जाणार असल्याचे लोकांचे म्हणणे असून सुरू असणाऱ्या खोदकामावरून लक्षात येत आहे. वंगणपाडा ते मांगरुळ ग्रामपंचायत कार्यालय या पट्ट्यात रस्ता होणार नसून खरी गरज याच भागातील मार्ग डांबरीकरण होण्याची आहे. तयार मार्गावर पुन्हा रस्ता व गरज असलेल्या ठिकाणी खड्ड्यांची चादर जैसेथे राहणार असल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. सरकारी निधीची नासाडी टाळण्यासाठी सुस्थितीत असणारा रस्ता जैसे थे ठेवून गरज आहे तिथे रस्ता बनवा अशी मागणी केली जात आहे.

बनविलेल्या रस्त्यांवर पुन्हा रस्ते बनवायचे उद्योग

सार्वजनिक बांधकाम, पंचायत समिती बांधकाम, प्रकल्प अशा विविध शाखांमार्फत टप्प्यात रस्ते बनवायचे, किमान रस्ता पाच वर्षे टिकावा अशी अपेक्षा असते मात्र त्याआधीच बनविलेल्या रस्त्यांवर पुन्हा नव्याने रस्ते बनवायचे हा उद्योग वाड्यात प्रत्येक ठिकाणी सुरू आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे शाखा अभियंता विनोद घोलप यांना याबाबत संपर्क केला मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT