अनधिकृत निमंत्रण पत्रिकेप्रकरणी अभियंता व उपअभियंत्यांना शिस्तभंगाची नोटीस
इमारत लोकार्पण व ट्रॉमा सेंटर भूमिपूजनाच्या पत्रिकेपासून महापालिकेचा संबंध नसल्याचा खुलासा
वसई : वसई-विरार महापालिकेच्या प्रभाग समिती 'ए' कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळा अखेर मानापमान नाट्यानंतर रद्द झाल्याचा खुलासा प्रशासनाने केला, मात्र महापौर अजीव पाटील आणि माजी आमदार क्षितीज ठाकूर यांनी थेट उद्घाटनच केले. अनधिकृत पत्रिका कशी आली, असा सवाल उपस्थित करत आयुक्तांनी अभियंत्यांना शिस्तभंगाची नोटीस दिली. तर वसईच्या आमदार नेहा दुबे यांनी विधानसभेत कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्याच्या मुद्द्यावर हक्कभंग प्रस्ताव दिला. त्यामुळे वसईतील लोकार्पण आणि भूमिपूजन समारंभ आता राज्यातही गाजू लागला आहे.
विरार पश्चिम येथे महापालिकेने प्रभाग समिती ‘अ’चे नवीन कार्यालय उभारले आहे. या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा १३ मार्च २०२६, शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला असल्याची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली होती. महापालिकेकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते.
निमंत्रण पत्रिका प्रसारित होताच त्यावर भाजपने आक्षेप नोंदवला. कार्यक्रमासाठी छापण्यात आलेल्या पत्रिकेत आमदार व खासदार यांची नावे वगळण्यात आली असून एकप्रकारे हे राजशिष्टाचाराचे उल्लंघन करण्यात आले असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला. वसई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या विरुद्ध लोकप्रतिनिधींचा अवमान केल्याप्रकरणी महाराष्ट्र विधानसभेत हक्कभंगाची सूचना दिली आहे.
मात्र शुक्रवारी दुसरीकडे घडले वेगळेच. निमंत्रण पत्रिकेमुळे प्रचंड वादग्रस्त ठरलेला आजचा हा नियोजित कार्यक्रम महापौर अजीव पाटील व माजी आमदार क्षितीज ठाकूर यांच्या हस्ते फीत कापून पार पडला. यावेळी पालिकेच्या शिपायापासून ते आयुक्तांपर्यंत कुणाचीही प्रशासकीय उपस्थिती नव्हती. स्थायी समितीचे सभापती प्रवीण शेट्टी व माजी नगरसेवक पंकज ठाकूर यांच्यासह बहुजन विकास आघाडीचे अनेक आजी-माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते. मात्र पालिकेचा कोणताही अधिकारी यावेळी उपस्थित नव्हता.
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, “हे दोन्ही कार्यक्रम झाले की नाही, याची चौकशी करून सांगता येईल. मात्र प्रशासनाची या कार्यक्रमांमध्ये कुठलीही इन्व्हॉलमेंट नव्हती, त्यामुळे आम्ही कुणी उपस्थित राहण्याचा प्रश्न उद्भवत नाही.”
महापालिकेच्या म्हणण्यानुसार या निमंत्रण पत्रिका वसई-विरार शहर महानगरपालिकेकडून अधिकृतरीत्या छापण्यात अथवा वितरित करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अशा निमंत्रण पत्रिका प्राप्त झाल्यास त्या अधिकृत समजू नयेत, असा खुलासा महापालिका आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. निमंत्रण पत्रिकेप्रकरणी वसई-विरार शहर महानगरपालिकेने संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे. शहर अभियंता व उपअभियंता यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ अंतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.