वसई: पावसाळा तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार शहर महानगरपालिकेकडून मान्सूनपूर्व कामांचे नियोजन अत्यंत वेगाने सुरू करण्यात आले आहे. याच नियोजनाचा एक भाग म्हणून वसई-विरार शहराचे महापौर अजीव पाटील यांनी आज सकाळी विरार येथील विविध विकासकामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली व कामांचा सविस्तर आढावा घेतला.
यामध्ये प्रामुख्याने विरार ग्लोबल सिटी परिसरातील रस्ते पॅचवर्क, नारिंगी रेल्वे उड्डाणपूल आणि शहरातील नालेसफाईच्या कामांचा समावेश होता. आगामी पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी पालिकेने हाती घेतलेली ही मान्सूनपूर्व कामे दिलेल्या मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे कडक निर्देश महापौर अजीव पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या पाहणी दौऱ्यादरम्यान महापौरांसोबत बहुजन विकास आघाडीचे स्थानिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी प्रत्यक्ष महापौरांची भेट घेऊन परिसरातील विविध समस्या मांडल्या आणि काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. नागरिकांच्या या सूचनांचे महापौरांनी स्वागत केले असून, त्या अनुरूप तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
पावसाळ्यात नालेसफाई वेळेत आणि योग्य पद्धतीने न झाल्यास ठिकठिकाणी पाणी साचून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. हाच धोका ओळखून, यंदा कुठेही पाणी साचणार नाही याची खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचून खड्डे पडू नयेत, या दृष्टीने सध्या सुरू असलेले रस्ते पॅचवर्कचे काम तांत्रिकदृष्ट्या चोख व योग्य पद्धतीने व्हावे, अशी तंबीही त्यांनी दिली.
याशिवाय, नारिंगी रेल्वे उड्डाणपूल जरी वाहतुकीसाठी सुरू झालेला असला, तरी त्याची उर्वरित काही कामे अद्याप प्रलंबित आहेत. ही राहिलेली कामे पावसाळ्यापूर्वी तातडीने पूर्ण करावीत, जेणेकरून पावसाळ्यात या मार्गावर कोणतीही वाहतूक कोंडी होणार नाही आणि वाहनचालकांचा प्रवास सुखकर होईल, अशा सूचना महापौर अजीव पाटील यांनी केल्या आहेत. महापौरांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली असून मान्सूनपूर्व कामांना आता अधिक गती मिळण्याची चिन्हे आहेत.