

मुंबई: राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी सोमवारी पदभार घेताच राज्यभरात विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते, त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर भेसळखोर, प्रतिबंधित गुटखा विक्रेते आणि नियमभंग करणाऱ्या आस्थापनांविरोधात धडक मोहीम हाती घेत 25 ते 27 मेदरम्यान तीनच दिवसांत 33 आरोपींना अटक केली आणि 27 आस्थापनांना सील ठोकले.
यात बृहन्मुंबई, कोंकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागांत मोठ्या प्रमाणावर छापेमारी करण्यात आली. गुटखा, पानमसाला आणि तत्सम प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीप्रकरणी 53 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 34 ठिकाणी नियमभंग आढळून आल्याने 25 एफआयआर दाखल करण्यात आले.
याशिवाय पाच वाहने जप्त करण्यात आली असून सुमारे 20.57 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बृहन्मुंबई विभागात सर्वाधिक कारवाई करण्यात आली. येथे 19 आस्थापना सील करण्यात आल्या असून 19 जणांविरोधात गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली.
या मोहिमेत गुटख्याव्यतिरिक्त पॅकबंद पिण्याचे पाणी, दूध, नूडल्स, खाद्यतेल, फरसाण, आईस्क्रीम, मसाले, खवा, पनीर, तूप, बेसन आणि बेकरी पदार्थांची तपासणी करण्यात आली. सुमारे 28.78 लाख रुपयांचा संशयित साठा जप्त करून नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत.
जळगावमध्ये गायीच्या दुधात खाद्यतेल मिसळून कृत्रिम दूध तयार केल्याचा प्रकार उघड झाला.
पुण्यात इथिलीन रसायनांचा वापर करून कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे जप्त करण्यात आले.
धुळे जिल्ह्यात अस्वच्छ वातावरणात मटर बेसन उत्पादन होत असल्याचे आढळून आले, धारावीत लेबलिंग नियमांचे उल्लंघन करून नूडल्स उत्पादन सुरू असल्याचे निदर्शनास आले.
नाशिकमध्ये बनावट लेबलिंग आणि परवाना नसताना उत्पादन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.
पालघरमध्ये अस्वच्छ वातावरणात आईस्क्रीम उत्पादन करणाऱ्या आस्थापनावर छापा टाकून लाखोंचा साठा जप्त करण्यात आला.
जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही. भेसळ, प्रतिबंधित पदार्थांची विक्री आणि असुरक्षित अन्न उत्पादनाविरोधातील कारवाई अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल,” असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. यापुढे लोकांना तत्काळ तक्रार करता यावी म्हणून नवीन मोबाईल ॲप आणि टोल-फ्री क्रमांक सुरू करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.