वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या निष्काळजीपणामुळे आज संपूर्ण शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे. एकेकाळी हरित वसई म्हणून ओळखले जाणारे हे शहर आता पालिकेच्या अकार्यक्षमतेमुळे विषारी वसई बनले आहे. यावर वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पर्यावरण अभ्यासक चरण भट्ट यांनी बोळिंज आणि गोखिवरे डम्पिंग ग्राऊंडमुळे होणाऱ्या प्रदूषणाविरोधात पुन्हा एक याचिका दाखल केली आहे.
गोखिवरे येथील डम्पिंग ग्राऊंड गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील नागरिकांसाठी शाप ठरले आहे. येथील कचऱ्यावर कोणतीही वैज्ञानिक प्रक्रिया होत नसून कचऱ्याचे केवळ डोंगर साचवले जात आहेत. परिणामी, मधुबन टाऊनशिप, गोखिवरे गाव, एव्हरशाईन सिटी, वालीव आणि भोईदापाडा यांसारख्या दाट लोकवस्तीच्या भागातील रहिवासी 24 तास विषारी दुर्गंधीत जगत आहेत. कचरा सातत्याने पेटत असल्यामुळे संपूर्ण परिसरात विषारी धुराचे लोण पसरत असतात. त्यामुळे नागरिकांना मोकळ्या हवेऐवजी विषारी वायूचा सामना करावा लागत आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर याचा मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम होत असून लहान मुलांना श्वसनाच्या व इतर दुर्धर व्याधीना सामोरे जावे लागत आहे.
यापूर्वीही चरण भट्ट यांनी न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने पालिकेला 184 कोटी रुपयांचा प्रचंड दंड ठोठावला होता. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. भट्ट यांच्या या लढ्यामुळेच पालिकेला कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर झाला आणि आज दोन मोठे प्रक्रिया प्रकल्प उभे राहत आहेत. मात्र, प्रकल्प असूनही कचरा जाळण्याची, उघड्यावर टाकण्याची आणि भ्रष्ट कारभाराची वृत्ती पालिका सोडायला तयार नाही, हे दुर्दैव आहे.
गोखिवरेप्रमाणेच आता आगाशी-बोळिंज रोडवरील डम्पिंग ग्राऊंडही पूर्णपणे अकार्यक्षम ठरले आहे. यामुळे बोळिंज, आगाशी, वटार व कोफराड आदि परिसरात मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण होत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून पालिकेला येथे कचरा व्यवस्थापन करता आलेले नाही. निवासी क्षेत्राच्या इतक्या जवळ कचरा जाळणे म्हणजे नागरिकांच्या जीविताशी चालवलेला खेळच आहे. जर 184 कोटींचा दंड बसूनही पालिकेला जाग येत नसेल, तर आता अधिक तीव्र कायदेशीर कारवाईशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट मत चरण भट्ट यांनी व्यक्त केले आहे.
कचरा व्यवस्थापनात 100% नापास ठरलेल्या महापालिका प्रशासनाने जर तात्काळ कचरा प्रक्रियेचे काम सुरू केले नाही आणि गोखिवरे व बोळिंज येथील परिस्थिती सुधारली नाही तर शहरातील वायू प्रदूषण भीषण रूप धारण करेल. यामुळे स्थानिकांना कर्करोग व इतर गंभीर आजार होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. थोडक्यात हरित वसईला विषारी वसई करण्याचे काम महापालिकेने केले असून वसई-विरार शहरच गॅस चेंबर बनवून टाकले आहे. मात्र प्रशासन कोणतीही जबाबदारी न घेता केवळ भ्रष्ट कारभारात मग्न असल्याचा आरोपही त्यांनी प्रशासनावर केला आहे.