वांद्री धरण कालव्यावरील मोरीच्या संरक्षक भिंतीला तडे pudhari photo
पालघर

Palghar News : वांद्री धरण कालव्यावरील मोरीच्या संरक्षक भिंतीला तडे

संरक्षक भिंत कालव्याचा बाजूने झुकली

पुढारी वृत्तसेवा

पालघर ः नविद शेख

वरई परगाव रस्त्यावर गुंदावे गावाच्या हद्दीत वांद्री धरणाच्या कालव्यावरील मोरीच्या संरक्षक भिंतीला तडे गेले असून संरक्षक भिंत कालव्याच्या बाजूने झुकली आहे. संरक्षक भिंत झुकल्याने मोरीवरील डांबरी रस्त्यावर खोलगट भाग तयार आहे. रस्त्यावरील खोलगट भागात भरधाव वेगातील वाहने उसळी घेत असल्यामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे.

मोरीची झुकलेली संरक्षक भिंत कोसळण्याची शक्यता आहे. वरई ते पारगाव दरम्यानच्या नऊ किलोमीटर अंतरापर्यंत अनेक ठिकाणी रस्ता खचला असून रस्त्याची उंची वाढल्यामुळे मोऱ्यांच्या संरक्षक भिंती गायब झाल्या आहेत.मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीसाठी माती मुरुमाची ओव्हरलोड वाहतूक आणि रस्त्यालगतच्या खोदकामामुळे वरई पारगाव रस्त्याची दुरावस्था झाली आहे.

पावसाळा सुरु होण्याआधी वरई पारगाव रस्त्यावरील मोऱ्यांच्या संरक्षक भिंती आणि रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे. वरई पारगाव रस्त्यामार्गे मुंबई अहमदाबाद महामार्ग आणि सफाळे रेल्वे स्थानक जोडले गेले आहे.दहिसर तर्फे मनोर गावाच्या हद्दीतील वैतरणा नदीवरील एकेरी पुलामुळे पालघर जिल्हा मुख्यालयाकडे मस्तान नाका - मनोर मार्गे जाण्याचे अंतर कमी झाले आहे. त्यामुळे वसई विरार, ठाणे आणि मुंबई येथून वरई पारगाव रस्त्यावरून दहिसर मार्गे पालघरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे.

सफाळे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील गावांमधील शेतमालाच्या विक्रीसाठी सफाळे बाजारपेठेत जाणारे शेतकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सफाळे बाजारपेठेत जाणारे ग्राहक या रस्त्याचा वापर करीत आहेत.मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गाच्या निर्मिती सह रेस्ट एरियाचे भराव कामासाठी माती-मुरूम, खडी आणि रेडिमिक्स वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड वाहनांची वर्दळ वरई पारगाव रस्त्यावर वाढली आहे.

अवजड वाहतूकीमुळे गुंदावे गावाच्या हद्दीतील वांद्री धरणाच्या कालव्यावरील मोरीची संरक्षक भिंत कोसळण्याच्या अवस्थेत आहे. मोरीच्या संरक्षक भिंतीला तडे गेले भिंत कालव्याच्या बाजूने झुकली आहे. अवजड वाहतूक सुरू असल्यामुळे मोरीवरील रस्त्यावर खोलगट भाग तयार झाला आहे.खोलगट भागात वेगातील वाहने उसळी घेत असल्यामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे.

अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था

मुंबई बडोदा दृतगती महामार्गाच्या अवजड वाहतूकीमुळे वरई पारगाव रस्त्यावर पडलेले खड्डे वाचवताना वाहनचालक आणि दुचाकीस्वारांची तारांबळ उडत आहे.अपघात होवून जिवीतहानी होण्याची शक्यता असल्याने मोऱ्यांवरील संरक्षक भिंती तसेच रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली जात आहे. वरई पारगाव रस्त्यालगत मुंबई-बडोदरा द्रुतगती महामार्गाचे काम सुरू झाल्याने वरई पारगाव रस्त्यावरील अवजड वाहतूकी मुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. साखरे गावाच्या हद्दीत मुंबई बडोदा दृतगती माहामार्गकडे जाणाऱ्या बेकायदेशीरपणे तयार केलेल्या रस्त्याचा उताराचा भाग तसेच नावझे गावाच्या हद्दीतील कॅम्पमध्ये अवजड वाहने भरधाव वेगात वळन घेत असल्याने अपघातांची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वरई पारगाव रस्त्यावरील रस्त्यावरील गुंदावे गावाच्या हद्दीतील कालव्यावरील मोरीच्या संरक्षक भिंतीची पाहणी करण्यात आली आहे. संरक्षक भिंतीच्या दुरुसस्तीसाठी अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी पाठवले जाईल.वरई पारगाव रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी वरिष्ठ कार्यालयात करण्यात आली आहे.
सत्तारसिंग पावरा, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT