वसई: वसई-विरार महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी बुधवारी महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. यावेळी शहराचा सुनियोजित विकास आणि पारदर्शकतेवर भर देणार असल्याचा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे.
वसई विरार महापालिकेचे तत्कालीन आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी हे 31 मार्च 2026 रोजी सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागी शासनाने वसई विरारचे नवे आयुक्त म्हणून पृथ्वीराज बी.पी यांची नियुक्ती केली आहे. बी.पी हे महापालिकेचे नववे आयुक्त आहेत.
पृथ्वीराज बी. पी. हे 2014 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी आहेत. यापुर्वी त्यांनी पुणे महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. बुधवारी त्यांनी वसई विरार महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.
पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्याच दिवशी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून विविध विभागाचा आढावा घेतला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, शहरातील प्राथमिक सोयीसुविधांचा दर्जा सुधारण्यावर आणि प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता यावी, यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
तसेच पर्यावरण संवर्धन, शहरातील वाढत्या हवा गुणवत्ता निर्देशांकावर नियंत्रण कसे मिळवता येईल याकडेही लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत आणि महापालीकेतील अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.