सफाळे : पालघर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्लीत भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी रेल्वेमंत्र्यांनी विलंबाने धावणाऱ्या लोकल व मेमू गाड्यांबाबत विशेष आढावा घेऊन योग्य त्या सूचना करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती खासदारांनी दिली.
पालघर जिल्ह्यातील हजारो नोकरदार, विद्यार्थी व व्यापारी दररोज डहाणूविरार मार्गावरून प्रवास करतात. मात्र मेल/एक्सप्रेस गाड्यांना मार्ग देण्यासाठी लोकल व मेमू गाड्यांना वारंवार साइडिंगला उभे केले जाते. यामुळे 20 ते 30 मिनिटांचा विलंब होऊन प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत लोकल गाड्यांना प्राधान्य देऊन त्यांचा वक्तशीरपणा सुधारावा, अशी ठोस मागणी खासदार डॉ. सवरा यांनी केली. पश्चिम रेल्वेने काही गाड्यांच्या थांब्यासाठी तांत्रिक व्यवहार्यता मान्य केल्याचा उल्लेख करत खासदारांनी खालील गाड्यांना पालघर येथे तातडीने थांबा देण्याची मागणी केली आहे
12935/36 वांद्रेसुरत इंटरसिटी एक्सप्रेस,20941/42 वांद्रेगाजीपूर एक्सप्रेस,12971/72 वांद्रेभावनगर एक्सप्रेस, 12009/10 मुंबई सेंट्रल अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेस वाढवण बंदर व प्रस्तावित विमानतळाच्या पार्श्वभूमीवर पालघर स्थानकाचे वाढते महत्त्व लक्षात घेता हे थांबे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.रेल्वेमंत्र्यांनी या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्याचे आश्वासन दिल्याचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी सांगितले. यामुळे पालघर जिल्ह्यातील प्रवाशांना लवकरच दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
डहाणू रोडवरून सुटणारी पहिली लोकल सध्या पहाटे 4:40 वाजता सुटते व 5:16 वाजता पालघरला पोहोचते. मात्र क्रॉसिंगमुळे तिला वारंवार उशीर होत असल्याने चाकरमान्यांना कार्यालयात वेळेवर पोहोचणे कठीण जाते. त्यामुळे पहिली लोकल 4:00 वाजता सोडावी, जेणेकरून ती सकाळी 6:15 पर्यंत चर्चगेट येथे पोहोचू शकेल, अशी विनंती खासदारांनी केली आहे.