Palghar Nashik Highway Pudhari
पालघर

Palghar Nashik Highway: पालघर-नाशिक राष्ट्रीय महामार्ग 160अ चौपदरीकरणाला 3,320 कोटींची मंजुरी; विकासाला वेग

कुंभमेळा आणि वाढवण बंदरासाठी महत्त्वपूर्ण निर्णय; ग्रामीण-आदिवासी भागाला नवी आर्थिक दिशा

पुढारी वृत्तसेवा

पालघर : महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच पालघर आणि नाशिक जिल्ह्या दरम्यानच्या दळणवळणाच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पालघर-नाशिक-सिन्नर-घोटी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160अ च्या सुधारणा व विस्तारीकरणास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी 3,320 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पालघर-सिन्नर महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे उत्तर महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यातील ग्रामीण व दुर्गम भागाच्या विकाससाला चालना मिळणार आहे. महामार्ग सुधारणा नसून उत्तर महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा विकासाचा महामार्ग ठरणार आहे. कुंभमेळा, वाढवण बंदर, पर्यटन आणि ग्रामीण विकासाला चालना देणारा निर्णय राज्य आणि पालघर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचा टप्पा ठरणार आहे. सहा ते सात वर्षांपूर्वी पालघर-जव्हार-त्र्यंबकेश्वर-घोटी-सिन्नर पर्यंतच्या सुमारे दोनशे किलोमीटर लांबीचा रस्ता राष्ट्रीय महमार्ग घोषित करण्यात आला. दरम्यानच्या काळात महामार्ग सुधारणेसाठी निधी उपलब्ध झाला नव्हता. पालघर पासून जव्हार फाटा ते त्र्यंबकेश्वर अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी आपघातांना निमंत्रण मिळत होते.

नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळयाच्या पार्श्वभूमीवर रस्ते आणि मूलभूत पायाभूत सुविधा उभारणीसाठी राज्याने प्रयत्न सुरू केले होते. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालघर सिन्नर महामार्गाच्या सुधारणेला केंद्राने हिरवा कंदील दिला आहे. 160 अ राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण होणार असून आवश्यक त्या ठिकाणी नवीन पूल, उड्डाणपूल व बायपासची उभारणी होणार आहे. अपघातप्रवण ठिकाणांचे सुधारित डिझाईन तयार केले जाणार आहे. तर कुंभमेळा काळात वाढणारी वाहतूक लक्षात घेऊन सुलभ मार्गरचना होणार आहे. तसेच वाढवण बंदराकडे जाणाऱ्या मालवाहतुकीसाठी सक्षम रस्ता सुविधा या अंतर्गत उभारली जाणार आहे.

नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यादरम्यान देशभरातून लाखो भाविक दाखल होतात. या काळात वाहतूक कोंडी, अपघात आणि विलंब यासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात जाणवतात. 160अ महामार्गाच्या सुधारणा झाल्यानंतर पालघर, वाडा, सिन्नर, घोटी मार्गे नाशिकपर्यंतचा प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनाला मोठी मदत होणार आहे.

पालघर जिल्ह्यात उभारण्यात येणारे वाढवण बंदर भविष्यातील मोठे आर्थिक केंद्र मानले जात आहे. बंदराशी जोडलेला सक्षम रस्ता हा उद्योग, निर्यात-आयात आणि मालवाहतूक यासाठी अत्यावश्यक घटक आहे. या महामार्गाच्या उन्नतीकरणामुळे वाढवण बंदरातून नाशिक व उत्तर महाराष्ट्रातील औद्योगिक पट्ट्यांपर्यंत मालवाहतूक अधिक जलद आणि खर्चिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. महमार्ग तयार झाल्यानंतर ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होऊन स्थानिकांना नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

लवकरच मोजणी प्रक्रिया राबवली जाणार

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून निधी मंजुरी मिळण्याआधी पालघर ते मुंबई अहमदाबाद महामार्गा पर्यंतच्या वीस किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण तर जव्हार फाटा ते त्र्यंबकेश्वर पर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरण करण्यासाठी आवश्यक भूसंपादनासाठी राष्ट्रीय महामार्ग अधिनियमा अंतर्गत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भूमीअभिलेख विभागाकडून लवकरच मोजणी प्रक्रिया राबवली जाणार आहे.

ग्रामीण भागाला विकासाची नवी दिशा

हा महामार्ग पालघर, वाडा, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, घोटी अशा अनेक ग्रामीण आणि आदिवासी भागांना जोडतो. सुधारित महामार्गामुळे कृषी उत्पादनांची बाजारपेठेपर्यंत जलद वाहतूक होणार आहे. पर्यटन स्थळांपर्यंत मार्गामुळे सहज पोहोचत येणार असून स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे.

पर्यटनाला चालना

पालघर, मोखाडा, जव्हार, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, घोटी परिसरातील निसर्ग पर्यटन, धार्मिक पर्यटन आणि डोंगरी पर्यटनासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. सुधारित रस्त्यांमुळे पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ज्याचा थेट फायदा स्थानिक व्यावसायिकांना होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT