Mokhada Two Wheeler Accident
पालघर : मोखाडा तालुक्यातील गोमघर गावाजवळ गुरूवारी (दि.२१) सकाळी दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असताना अपघातानंतर वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर जखमी तरुण गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडून होते. मात्र खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राची अथवा १०८ रुग्णवाहिका सेवा वेळेत उपलब्ध न झाल्याने उपचारासाठी तब्बल दोन तासांचा विलंब झाला. वेळेत वैद्यकीय मदत मिळाली असती तर मृत तरुणांचे प्राण वाचले असते, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, त्या मार्गावरून जाणारे निखिल गारे यांनी स्वतःच्या वाहनातून आणि पोलिसांच्या मदतीने दोन जखमींना खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यापैकी एका तरुणाचा मृत्यू झाला.
या अपघातात अनिल यशवंत सवरा (वय २८, बोट्याचा पाडा) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर लक्ष्मण गांगड (वय २८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिलीप गांगड आणि देवीदास गांगड हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर मृतदेह वाहून नेण्यासाठीही रुग्णवाहिका किंवा अन्य शासकीय वाहन वेळेत उपलब्ध झाले नाही. तब्बल चार ते पाच तास मृतदेह रस्त्यावर पडून राहिल्यानंतर ग्रामस्थांनी एका वीट वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून मृतदेह पाठवला. या प्रकारामुळे आरोग्य व्यवस्थेच्या अनास्थेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, खोडाळा-वाडा मार्गावरील गोमघर गावाजवळ, खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला. दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला.
पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर यापूर्वीही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नुकत्याच मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातातही वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याची घटना ताजी असताना मोखाड्यातील या घटनेने पुन्हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
वेळेत उपचार मिळाले असते तर जखमींचे प्राण वाचू शकले असते, अशी भावना स्थानिक नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे. तसेच मृतदेह वाहतुकीसाठी योग्य व्यवस्था न झाल्याने मृत व्यक्तींचा अवमान झाल्याची तीव्र खंत परिसरातून व्यक्त होत आहे.