Sant Namdev Maharaj Sanjivan Samadhi Sohala
दीपक गायकवाड
खोडाळा : वारकरी संप्रदायाचे तेजस्वी नक्षत्र, विठ्ठलाचे लाडके लेकरू, भागवत धर्माचा भक्कम पाया रचणारे आणि अजरामर अभंगगंगेचे निर्माते श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा खोडाळा नगरीत अत्यंत भक्तिभावपूर्ण, शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आहे.
समस्त शिंपी समाज बांधव, खोडाळा यांनी गेल्या चार वर्षांपासून अखंडपणे जपलेल्या या भक्ती परंपरेचे हे चौथे पुष्प असून दरवर्षीप्रमाणे यंदाही सोहळ्याला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या कृपाछत्राखाली आणि बजरंगबलीच्या आशीर्वादाने हा सोहळा म्हणजे भक्ती, सेवा आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगमच ठरला.
सोहळ्याची सुरुवात सकाळी ठीक १० वाजता झाली. मंदिर परिसरात सहस्रार्चन महापूजा व तीर्थप्रसादाने मंगलमय प्रारंभ करण्यात आला. वैदिक मंत्रोच्चार, शंखनाद आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात संपूर्ण मंदिर परिसर भारावून गेला होता. भाविकांनी अत्यंत लीन होऊन महापूजेत सहभाग घेतला. दुपारी २ वाजेपर्यंत चाललेल्या या पूजेनंतर तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले.
दिवसाचे मुख्य आकर्षण ठरला तो सायंकाळचा भव्य पालखी सोहळा. सायंकाळी ४ ते ६ या वेळेत संत नामदेव महाराजांच्या पादुकांची सजवलेल्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. पुढे भगवे ध्वजधारी वारकरी, मागे टाळ-मृदंगाच्या गजरात हरिपाठ म्हणणारे वारकरी आणि विठ्ठल नामाचा अखंड जयघोष... या भक्तिमय वातावरणाने अवघी खोडाळा नगरी दुमदुमून गेली होती. "ज्ञानोबा-माऊली तुकाराम" आणि "जय जय राम कृष्ण हरी" च्या गजराने आबालवृद्धांचे पाय आपोआप या पालखी सोहळ्याकडे ओढले जात होते. अनेक भाविकांनी आपल्या घरासमोर रांगोळ्या काढून, पायघड्या घालून पालखीचे स्वागत केले. हे दृश्य अत्यंत अविस्मरणीय होते.
पालखी सोहळ्यानंतर रात्री ७.३० वाजल्यापासून सर्व भाविकांसाठी महाप्रसाद व प्रीतीभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाला केवळ जेवण न मानता भाविकांनी नामदेव महाराजांचा प्रसाद म्हणून अत्यंत श्रद्धेने ग्रहण केले.शेकडो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
संत शिरोमणी नामदेव महाराजांनी वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी विठ्ठल भक्तीचा मार्ग धरला आणि संपूर्ण भारतभर भागवत धर्माचा प्रसार केला. पंजाबमधील घुमान येथे त्यांनी संजीवन समाधी घेतली, पण त्यांचे विचार आजही प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात जिवंत आहेत. अशा या महान संताचा समाधी सोहळा खोडाळा सारख्या ग्रामीण भागात इतक्या भव्यतेने साजरा होणे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे.
या भक्तिसागरात खोडाळा व पंचक्रोशीतील शिंपी समाज बांधवांसह सर्व समाजातील नागरिक, वारकरी संप्रदायातील मंडळी,हरीपाठ बंधू भगिनी आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हा संपूर्ण सोहळा यशस्वी करण्यासाठी समस्त शिंपी समाज बांधव, खोडाळा आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि सेवाभावामुळेच हा सोहळा निर्विघ्नपणे आणि अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला.
या सोहळ्यामुळे खोडाळा नगरीत पुन्हा एकदा भक्ती, एकता आणि संस्कृतीचा जागर झाला असून पुढील वर्षी हा सोहळा आणखी मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.