पालघर शहर ः ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. पालघर जिल्हा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या नेतृत्वात पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले असून या कामबंद आंदोलनात पालघर जिल्ह्यातील 100 ग्राम पंचायतीतील 200 हून अधिक ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले आहेत. या आंदोलनामुळे ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायत कामकाजावर परिणाम झाला असून कामकाज ठप्प झाले आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पत्रव्यवहार व आंदोलने केली. मात्र याबाबत कोणताही ठोस निर्णय आजतगायात घेण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन बुधवार 25 मार्च ते 31 मार्चपर्यंत कामबंद आंदोलन पुकारले आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन जमा होणाऱ्या खात्याची माहिती वारंवार चुकण्याचे किंवा चुकवल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत नाही, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनातील वेळोवेळी होणारे घोळ दूर करावेत आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देण्यात यावे. इतर जिल्हाप्रमाणे पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अद्याप कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता प्रति महिने एक हजार रुपये मिळाला नाही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कोरोना प्रोत्साहन पर भत्ता लवकरात लवकर देण्यात यावा.
ग्रामपंचायत कर्मचारी गावातील सफाई, पाणीपुरवठा, कार्यालयीन कामासाठी कार्यरत असतात परंतु ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा आरोग्य विभाग व अपघात विमा दिला जात नाही. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा व अपघात विमा देण्यात यावा. ग्रामपंचायत कर्मचारी गावातील सफाई, पाणीपुरवठा कार्यालयीन कामासाठी प्रवास करतात परंतु ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडे ओळखीचा कोणताही पुरावा नसल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना गावातील सफाई, पाणीपुरवठा व कार्यालयीन कामासाठी ओळखपत्र देण्यात यावे. आदी मागण्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केल्या असून कामबंद आंदोलन पुकारले आहे.