पालघर : पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पालघर जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयावर घडवून आणली आणि यातील अनेक महत्त्वांच्या विषयांची सोडवणूक देखील करण्यात आली. यावेळी बोईसर विधानसभेचे आमदार विलास तरे यांनी पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा असून या ठिकाणी भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक व्हावे अशी मागणी केली.
या मागणीला प्रतिसाद देत त्याच क्षणी त्याच जागेवर पालकमंत्री गणेश नाईक यांनी ही जिल्हा नियोजन समिती भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक होण्याचा ठराव संमत करीत असल्याचे सांगत सर्व उपस्थित आमदार यांच्या उपस्थितीत हा ठराव मंजूर करून घेतला.
राज्यात सर्वाधिक देखने असलेल्या पालघर जिल्हा प्रशासकीय इमारतींच्या सौंदर्यामध्ये आता भगवान बिरसा मुंडा यांच्या होणाऱ्या भव्य स्मारकामुळे भर पडणार असल्याचे दिसून येत आहे. नियोजन समितीच्या सुरुवातीलाच नियोजन अधिकारी प्रशांत भामरे यांनी आराखडा मांडला यावर पालकमंत्री नाईक यांनी फुगीर आराखडा निर्माण करायचा आणि उधारीत कामे करायची असा कारभार यापुढे चालणार नसल्याचे ठाम मत यावेळी व्यक्त केले.
यावेळी पालघर विधानसभेचे आमदार राजेंद्र गावित यांनी या आराखड्यातील अनेक बाबींवर प्रश्न उपस्थित करत प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून याची उत्तरे घेतली यावेळी गावित यांनी जनावरे त्यांचे खाद्य पशु तसेच डहाणू प्रकल्पातील ठक्कर बाप्पा योजना याबाबत देखील विचारणा केली तर केळवे येथील बांधकाम असेल की कासा चारोटी या भागात झालेल्या वादळामध्ये अद्याप पर्यंत भरपाई न मिळालेल्या नागरिकांचा मुद्दा देखील गावित यांनी यावेळी समोर आणला. तर नालासोपारा विधानसभेच्या आमदार स्नेहा दुबे पंडीत यांनी त्या भागातील अनेक विभागात वीज जोडणी नसल्याचे सांगितले.
यावेळी नाईक यांनी या भागातील अतिक्रमणांचा देखील विषय काढत जिल्ह्यातील सर्वच अतिक्रमणे तपासून हटविण्याचा सूचना देखील संबंधित अधिकाऱ्यांना केल्या तर अतिक्रमणे हटवली जातील तेव्हा हटवली जातील मात्र आज व्यक्ती कसाही असला तरी त्याच्या डोक्यावर छप्पर हवे त्याला वीज,पाणी द्यायला हव्या अशा सूचना देखील नाईक यांनी माणुसकीच्या भूमिकेतून केल्या.
यावेळी विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांनी अतिशय चांगले विषय घेत शाळांमधील मुलींच्या स्वच्छतागृहांचा विषय शाळांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावणे याशिवाय स्मशानभूमी या ठिकाणी विज पाणी संरक्षण भिंत आणि ज्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज वीज जोडणी नाही. किंवा विज बिल थकल्यामुळे वीज बंद करण्यात आली आहे अशा शाळांमध्ये सोलर लावून या शाळा प्रकाशित करण्याच्या सूचना देखील डावखरे यांनी प्रशासनाला दिल्या. तर यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी 259 शाळाना सोलर वीज जोडणी केल्याचे उत्तर दिले.
यावेळी बोईसर विधानसभेचे आमदार विलास तरे यांनी तेलदार वसई फाटा गोखिवरे या भागातील वाहतूक कोंडीबाबत मार्ग काढण्याच्या सूचना दिल्या. तर याच प्रश्नाला धरून पालकमंत्री नाईक यांनी सुद्धा पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांना हायवेवर चालणारी अवजार वाहने डाव्या बाजूला न चालता उजव्या बाजूला चालतात.
यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या तर याला उत्तर म्हणून लवकरच ऑनलाईन दंड करणारी उपकरणे या ठिकाणी बसवले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी वाडा ग्रामीण रुग्णालयाच्या दुरावस्थेबाबत प्रश्न मांडत यावर तोडगा काढण्याच्या सूचना केल्या त्यावर वन विभागाकडून अडीच एकर जागा दिल्याचे सांगण्यात आले. तर मोरे यांच्याकडून वाडा येथील बस शहराच्या ठिकाणी असल्याने त्या ठिकाणी वाहन कोंडी होते. यामुळे हे बस स्थानक जवळच असलेल्या वीस एकर जागेमध्ये व्हावे अशी मागणी मोरे यांनी केली.
एकूणच पालघर जिल्ह्याची नियोजन समिती बैठक यशस्वीरित्या पार पडली यामध्ये जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा समृद्ध होण्यासाठी काम सुरू असलेले ड्रामा केअर सेंटर पालघर जिल्हा रुग्णालय याबाबत देखील पालकमंत्री नाईक यांनी माहिती घेऊन अधिकाऱ्यांना काम तात्काळ करण्याचे सूचना केल्या तर ही कामे करताना अनेकदा निधी कमी पडत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले याबाबत देखील नाईक यांनी याबाबत लेखी माझ्याकडे द्या नीधीसाठीचा पाठपुरावा माझ्याकडून करण्यात येईल असा शब्द देखील त्यांनी सभागृहात दिला.
शासनाकडून पालघर जिल्ह्यासाठी यंदा 674.17 कोटी रुपयांच्या निधीकरिता प्रारूप आराखडा तयार करण्याची मर्यादा आखण्यात आली होती. त्या अनुसार आदिवासी उपाययोजनेतून 410.43 कोटी रुपये, सर्वसाधारण घटकांसाठी 294.74 कोटी रुपये तर विशेष घटकांसाठी 14 कोटी रुपयांच्या प्रस्तावित कामांना मंजुरी देण्यात आली. मात्र विविध विभागांकडून (यंत्रणा) करण्यात आलेल्या विकास कामांसाठी निधीची मागणी लक्षात घेता आदिवासी उपाययोजनेसाठी अतिरिक्त 100 कोटी रुपये, सर्वसाधारण योजनेसाठी 333.50 कोटी रुपये तर विशेष घटक योजनेसाठी 40 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली जाणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.
भ्रष्टाचार करण्यासाठी माझ्या नावाचा वापर?
यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी आपल्यावर असलेली जबाबदारी ढकलणारी माणसं ही त्या पदाला अशोभनीय असतात जबाबदारी घ्यायची नसेल तर त्या पदावरून अधिकाऱ्यांनी मुक्त व्हायला हवे तसेच सर्व प्रशासनाच्या खात्यामध्ये समन्वय देखील आवश्यक असल्याचे सांगितले. मी राजकीय सामाजिक कौटुंबिक जीवनात खूप समाधानी आहे कारण की पैसा माध्यम असू शकतो मात्र साध्य नाही गरजे एवढा पैसा माणसाला आनंद देतो यामुळे मी भ्रष्टाचाराच्या भानगडीत पडत नाही मात्र भ्रष्टाचार करण्यासाठी काही ठिकाणी माझ्या नावाचा वापर होतो.असा आरोप देखील नाईक यांनी यावेळी केला.
यामुळे पालघर जिल्ह्यात भ्रष्टाचार करण्यासाठी पालकमंत्र्यांचे नाव नेमके कोण वापरते असा प्रश्न देखील उपस्थित त्यांना पडल्याची दिसून आले.यावेळी नियोजन समिती बैठकीच्या शेवटाकडे जाताना नाईक यांनी मला पालकमंत्री म्हणून काम करण्यासाठी अजून 48 महिने आहेत या दिवसांत पालघरला एक वेगळी ओळख मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असतानाच पुन्हा एकदा पालघर चौथी मुंबई करणार असल्याचा पुनरुच्चार नाईक यांनी यावेळी केला.
पद्मश्री भिकल्या धिंडा यांचा सन्मान
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वाळवंट येथील प्रसिद्ध तारपा वादक विकल्या दिंडा यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल जन माणसातून त्यांचे अभिनंदन होत आहे. यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी सुद्धा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये भिकल्या धिंडा यांचा सन्मान केला.यावेळी सर्व अधिकारी वर्ग आणि लोकप्रतिनिधी आमदार यांच्या उपस्थितीत झालेल्या या सन्मानाची देखील चर्चा होत आहे.