पालघर: आदिवासीबहुल व भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असलेल्या पालघर जिल्ह्यात माता व बाल आरोग्य सेवेला अधिक बळकटी देण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध स्तरांवर सातत्यपूर्ण उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
उपलब्ध आरोग्यविषयक निर्देशांकांनुसार पालघर जिल्ह्याने बाल आरोग्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून, सन २०१४-१५ च्या तुलनेत सद्यस्थितीत बालमृत्यूच्या संख्येत ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली असल्याचा दावा जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
SRS-२०२० नुसार भारताच्या ग्रामीण भागातील अर्भक मृत्यू दर प्रति हजार जिवंत जन्मांमागे ३१, तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील दर २० इतका आहे. त्या तुलनेत पालघर जिल्ह्याचा उपलब्ध अर्भक मृत्यू दर ७ प्रति हजार जिवंत जन्म इतका आहे. यामुळे पालघर जिल्ह्यातील अर्भक मृत्यूचे प्रमाण राष्ट्रीय व महाराष्ट्राच्या ग्रामीण सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या कमी असल्याचे स्पष्ट होते.
SRS-२०२० मध्ये भारताचा ग्रामीण IMR ३१ असल्याची अधिकृत/विश्वसनीय आकडेवारी उपलब्ध असल्याचे मत आरोग्य विभागाने व्यक्त केले आहे. NFHS-5 (२०१९-२१) हे देशव्यापी प्रतिनिधिक सर्वेक्षण असून त्यामध्ये बालमृत्यू, अर्भक मृत्यू, माता-बाल आरोग्य आदी निर्देशकांचा समावेश आहे.
दोन वर्षांत ५०१ बाल-माता मृत्यूंची नोंद आहे त्यामानाने पालघर जिल्ह्यातील उपलब्ध विभागीय आकडेवारीनुसार सन 2024-25 व 2025-26 या दोन आर्थिक वर्षांत 474 बालमृत्यू आणि 27 मातामृत्यू, असे एकूण 501 मृत्यू नोंदविण्यात आले आहेत. मात्र एकही बालकाचा मृत्यू होणे हे निश्चित शोभनीय नाही.
यासाठीच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ग्राम बाल विकास केंद्र, बाल उपचार केंद्र,पोषण पुनर्वसन केंद्र,नियमित लसीकरण अंतर्गत आशांच्या गृहभेटी,पुनरागमन शिबिरे वीटभट्टीवरील बालकांची आरोग्य तपासणी डहाणू व जव्हार येथील बालकांची आरोग्य तपासणीयांचा समावेश आहे. जिल्हा, तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर माता-बाल नियंत्रण कक्ष कार्यरत आहेत.
बालमृत्यूचे सखोल अन्वेषण
बालमृत्यू किंवा मातामृत्यूची प्रत्येक घटना आरोग्य विभागाकडून गांभीर्याने घेतली जाते. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार माता व बाल मृत्यू अन्वेषण कृती समिती तसेच तांत्रिक अन्वेषण समिती यांच्या माध्यमातून प्रत्येक घटनेमागील वैद्यकीय व सामाजिक कारणांचा सखोल अभ्यास केला जात असल्याचे पालघर आरोग्य विभाग सांगत आहे.
आगामी काळातही “प्रत्येक माता सुरक्षित आणि प्रत्येक बालक निरोगी” या उद्दिष्टाने आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, उच्च जोखमीच्या माता-बालकांचे Tracking, पोषण, नवजात बालकांची विशेष काळजी आणि तातडीची संदर्भ सेवा अधिक सक्षम करण्यात येणार आहे.- डॉ. संतोष चौधरी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर