Maharashtra Tree Plantation Pudhari
पालघर

Maharashtra Tree Plantation: राज्यात 300 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प; वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा

टिश्यू कल्चर लॅबच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोपांची निर्मिती; पालघरमध्ये वनराई व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण

पुढारी वृत्तसेवा

पालघर : वनखात्याची जबाबदारी माझ्याकडे असल्याकारणाने यामध्ये वनमंत्री म्हणून अनेक मोठे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली असून सुरुवातीच्या टप्प्यात 200 कोटी वृक्ष लागवड करण्याचा आमचा मानस होता. मात्र आता 300 कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प आम्ही केल्या असल्याची घोषणा पालघर येथे राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांनी केली आहे. आदर्श ग्रामसेवक, आदर्श ग्रामपंचायत अधिकारी तसेच वनराई पुरस्कार वितरण समारंभ जिल्हा परिषद पालघर जननायक बिरसा मुंडा सभागृह येथे नुकताच पार पडला.त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की याशिवाय एवढ्या मोठ्या संख्येने झाडे लावायची यासाठी रोपे तयार करण्याचे मोठे आव्हान आमच्यासमोर आहे. मात्र ही रोपे तयार करण्यासाठी पाच ठिकाणी टिशू कल्चर लॅब तयार करण्यात आले असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोपांची निर्मिती होणार आहे. राज्यभर हे रोपवाटप सुरळीत व्हावे यासाठी हे टिशू कल्चर कोकण विभागासाठी शहापूर, पुणे विभागासाठी पुणे येथे मराठवाड्याकरिता छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी तर विदर्भाकरिता नागपूर आणि खानदेशाकरिता जळगाव या ठिकाणी हे लॅब तयार करण्यात आल्याचे यावेळी नाईक यांनी सांगितले. याशिवाय यातील रोप तयार करणाऱ्या दोन लॅब चे उद्घाटन देखील करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या रोपांची भविष्यातील लागवड त्याचे संगोपन यासाठी एक चार्ट देखील निर्माण केला असून वनविभाग भविष्य काळात कशी वाटचाल करणार आहे. याची माहिती मी विधान भवनात दिल्याचे देखील नाईक यांनी यावेळी सांगितले. यामुळे ग्लोबल वॉर्मिंग पासून वाचण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणे हे वनविभागाची ध्येय असणार आहे.

नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श ग्रामसेवक, आदर्श ग्रामपंचायत अधिकारी तसेच वनराई पुरस्कार वितरण समारंभ जिल्हा परिषद पालघर जननायक बिरसा मुंडा सभागृह येथे उत्साहात पार पडला. यावेळी आमदार राजेंद्र गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे,प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा डॉ रुपाली सातपुते,उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीक मसलत,तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अशोक पाटील यांच्या नियोजनातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

वनराई उपक्रमांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान पाच बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टाला प्रतिसाद देत अनेक ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट कामगिरी केली. चहाडे ग्रामपंचायतीने सर्वाधिक 15 बंधारे उभारले, तर भाताणे, आडणे व बऱ्हाणपूर ग्रामपंचायतींनी प्रत्येकी 12 बंधारे उभारून उल्लेखनीय कामगिरी केली. या उपक्रमांतर्गत एकूण 38 ग्रामपंचायतींना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यासोबतच आदर्श ग्रामसेवक (सन 2022-23 व 2023-24) तसेच आदर्श ग्रामपंचायत अधिकारी (सन 2024-25) पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. गेल्या काही वर्षांतील प्रलंबित पुरस्कार वितरित करण्यात आल्याने संबंधितांमध्ये समाधानाचे वातावरण होते. राजेंद्र गावित यांनी आपल्या प्रतिपादनात ग्रामविकासासाठी सरपंच, ग्रामसेवक आणि प्रशासन यांचे समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी आपल्या मनोगतातून जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांमध्ये सर्व घटकांचा सहभाग महत्त्वाचा असून, शाश्वत विकासासाठी अशा उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT