

खानिवडे: पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध सफेद कांद्याच्या सरासरी उत्पादनात कमालीची घट होण्याची धास्ती शेतकऱ्यांना लागली आहे.अगोदरच यंदाचा खरीप हंगाम खूप म्हणजेच जवळपास सहा महिने बरसलेल्या पावसामुळे नुकसानीत निघाला असताना आता रब्बीतील शेतात काढणीला आलेल्या कांद्याच्या उत्पादनाचा घटणारा संकेत शेतकऱ्यांना चिंतेच्या गर्तेत ढकळणारा ठरू लागला आहे.
यंदा वेळेपेक्षा जास्त लांबलेल्या व बरसलेल्या धुवाधार पावसामुळे जमिनीत नको तेव्हढा अतिरिक्त ओलावा मार्च संपला तरी ओलाच असल्याने कांद्याचा आकार म्हणावा तसा पिकला नाही.वातावरणात होणारा बदल,नको तेव्हढा ओलावा यामुळे कांद्याची पात वरून करपली आहे.पीक चांगले व्हावे म्हणून शिफारशी नुसार खतांची मात्रा व औषध फवारणी करूनही कांदा आकाराने लहान राहिला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीपानंतर कांदा हंगाम ही रडवणारा ठरणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. लांबलेल्या पावसामुळे खरिपातील हळवे व नीम गरवे पीक भिजून चिखलात लोळून नष्ट झाले होते.
यामुळे जिल्ह्यातील सर्वाधिक महत्वाचे व मुख्य पीक असलेल्या भात उत्पादक शेतकऱ्यांचा पीक लागवडीचा खर्चही भरून निघाला नव्हता. यामुळे शेतकऱ्यांची सारी मदार रब्बी हंगामावर विशेषतः प्रसिद्ध व मोठी मागणी असलेल्या सफेद कांदा पिकावर अवलंबून होती.मात्र सद्ध्याची कांदा पिकांची शेतातील स्थिती पाहता खरिपा प्रमाणेच रब्बी हंगाम काढताना बी बियाणे,खते औषधे,अवजारे व उखळणीचे ट्रॅक्टर भाडे,मजूर व महागाई तसेच विपरीत हवामान यांचा सामना करण्यासाठी झालेला खर्च तरी निघेल का याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
लांबलेल्या पावसामुळे लागवडीला उशीर झाल्याने पीकही वेळेपेक्षा लांबले आहे. दरसाल मार्च च्या मध्यान्ही बाजारात येणारा कांदा मार्च संपला तरी शेतातच आहे. कांदा पीक काढतो न काढतो तोच समोर येणाऱ्या खरिपाच्या तयारीची कामे डोक्यावर आहेत.दरसाल गुढी पाडव्याला राबाणीचा शुभारंभ होतो.त्यानंतर बांधबंदिस्ती , खांडी बांधणी ही होणारी कामे ही लांबली आहेत. याचा परिणाम खरीप हंगामाच्या कामांमध्ये मोठी धावपळ उडेल असे शेतकरी सांगत आहेत.