खानिवडे : समुद्रात जावू नको असे सांगितले असतानाही अर्नाळा समुद्रकिनारी गेलेले चार मुल बुडाल्याची घटना गुरुवारी घडली आहे. यापैकी दौघांना वाचवण्यात यश आले आहे. तर दोघांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पश्चिम येथील चार युवक अर्नाळा समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेले होते. यावेळी पोहण्यासाठी जाण्यास मज्जाव केला असता, त्यांची नजर चुकवून चौघेही मुले पाण्याच्या दिशेने गेले. पाण्यात उतरलेली मुले समुद्राच्या मोठ-मोठ्या लाटांनी गटांगळ्या खावू लागली.
मुलांनी आरडा ओरडा सुरू केला.त्यांचा आवाज एकून पोलीस, होमगार्ड यांनी समुद्रात उड्या घेतल्या. अथक प्रयत्नांनी दोघा मुलांना बाहेर काढण्यात यश आले. इतर दोन मुले पाण्याच्या जोरदार प्रवाहात दिसेनाशी झाली. बुडालेल्या दोघांचाही शोध जीव रक्षक दलाकडून युद्धपातळीवर सुरू असून मोठ्या लाटांमुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत.
घटनास्थळी तैनात असलेल्या जीवरक्षकांनी तत्परता दाखवत मोहम्मद अब्दुल हसमुद्दीन शेख (१९) व मोहम्मद सात अफसर खान, (१६) यांना सुरक्षित बाहेर काढले. मात्र शोएब खान, (१८) व आयान झाकीर हुसेन मंडळ, (१९) हे दोघे समुद्राच्या पाण्यात वाहून गेल्याने बेपत्ता झाले. घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, पोलीस प्रशासन, स्थानिक जीवरक्षक व अन्य संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.
बेपत्ता युवकांचा शोध घेण्यासाठी शोध व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. सध्या समुद्रात भरती, उंच लाटा आणि प्रतिकूल हवामानामुळे शोधमोहीमेत अडथळे येत आहेत. समुद्राची परिस्थिती अनुकूल होताच शोधकार्य आणखी तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. पावसाळ्यात समुद्रात उतरताना नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.