डहाणू : डहाणू ते चारोटी हा महत्त्वाचा मार्ग सध्या काँक्रीटीकरणाच्या संथ कामामुळे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. तालुक्यातील प्रमुख संपर्क मार्ग असलेल्या या रस्त्याच्या कामाला अपेक्षित गती मिळत नसल्याने दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे डहाणू गाठण्यासाठी एक तासापेक्षा अधिक वेळ लागत असून वाहनचालकांसह प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
डहाणू हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्याने विविध कामांसाठी दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक येथे ये-जा करतात. शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण, रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण तसेच विविध शासकीय कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचा या मार्गावर मोठ्या प्रमाणात वावर असतो. मात्र, रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे नागरिकांचा वेळ आणि त्रास दोन्ही वाढले आहेत.
डहाणू ते चारोटी रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी ऑक्टोबर 2024 मध्ये प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. या प्रकल्पासाठी सुमारे 250 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. निधी मंजूर झाल्यानंतर नागरिकांमध्ये चांगल्या आणि सुरक्षित रस्त्याची अपेक्षा निर्माण झाली होती. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर विविध अडचणींमुळे प्रकल्प सातत्याने रखडत चालल्याचे चित्र आहे.
कामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात रस्त्यालगत असलेल्या झाडांच्या तोडीचा प्रश्न मोठा अडथळा ठरला होता. झाडे तोडण्याच्या परवानग्या मिळण्यासाठी अनेक महिने प्रतीक्षा करावी लागली. अखेर संबंधित विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर झाडे तोडण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली.
अपघातांच्या घटना
रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने वाहतुकीत सातत्याने अडथळे निर्माण होत आहेत. या मार्गावर किरकोळ अपघातांच्या घटनाही घडत असून वाहनचालक आणि प्रवाशांना मोठी कसरत करत प्रवास करावा लागत आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी आणि रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना विस्कळीत वाहतुकीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पावसाळ्यापूर्वी खोदून ठेवलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. पावसाळ्यात नागरिकांना अधिक अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येणार आहे.
अधिग्रहणावरून वाद
सध्या रस्त्याच्या काही भागांमध्ये जमीन अधिग्रहणावरून वाद निर्माण झाले असून त्यामुळे ाँक्रीटीकरणाच्या कामात अडथळे येत असल्याची माहिती समोर आली आहे. पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात करण्यात आली असली तरी गेल्या चार ते सहा महिन्यांपासून कंत्राटदार कंपनीकडून अतिशय संथ गतीने काम सुरू असल्याने रस्त्याची स्थिती जैसे थेच आहे.
डहाणू ते चारोटी रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामामध्ये काही परवानग्या प्रलंबित होत्या. तसेच सध्या उद्भवलेल्या जमीन अधिग्रहण वादामुळे विलंब होत आहे. तरीदेखील सध्या खणून ठेवलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आमच्यापरीने सुरू आहे.नितीन पगारे, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, डहाणू.